जागतिक बुद्धिस्ट परिषदेचे औरंगाबादेत आयोजन

नवी दिल्ली:- जगप्रसिद्ध अजिंठा व वेरुळ येथे दिनांक २२ ते २५ ऑगस्ट २०१८ दरम्यान जागतिक बुद्धिस्ट परिषद होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री पर्यटन जयकुमार रावल यांनी आज दिली.

परिवहन भवनात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ए.के. अल्फाँस यांची आज श्री.रावल यांनी भेट घेतली. बैठकीनंतर श्री.रावल यांनी महाराष्ट्रात प्रथमच जागतिक बुद्धिस्ट परिषद होणार असल्याचे सांगितले. यावर्षी ही परिषद दिनांक २२ ते २५ ऑगस्टला युनोस्कोचा दर्जा प्राप्त असलेल्या औरंगाबाद येथील अंजिठा-वेरूळ लेण्यांच्या ठिकाणी होणार असल्याचे सांगितले.

यापूर्वी जागतिक बुद्धिस्ट परिषद ही उत्तर प्रदेश आणि बिहार येथे होत असे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्राला ही संधी प्रथमच मिळाली असल्याचे श्री.रावल म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक बुद्धिस्ट परिषदेसाठी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल आभार मानले.

जागतिक बुद्धिस्ट परिषदेत जगातील बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधीत्व असेल. किमान २५ राष्ट्रे या परिषदेत सहभागी होतील, असे रावल यांनी सांगितले. या जागतिक परिषदेनिमित्त महाराष्ट्राला आदरातिथ्य करण्याची संधी मिळेल, यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे ही श्री.रावल म्हणाले. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *