महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत ‘सीआयआय’चे मोठे योगदान – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई:- महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत ‘सीआयआय’ अर्थात ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज’ या संस्थेचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्यामुळे काल राज्य औद्योगिकदृष्ट्या देशात आघाडीवर असल्याचे गौरवोद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे काढले.
‘सीआयआय’ या संस्थेने सेवा व उद्योग वाढीची १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित केला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, बजाज कंपनीचे संचालक संजीव बजाज, पिरामल ग्रुपचे संचालक आनंद पिरामल, ‘सीआयआय’च्या स्वाती सालगावकर आदी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार विद्यमान औद्योगिक धोरणात कुठलेही बदल करणार नाही. उलट आवश्यक तिथे नवीन धोरण आखण्याचे काम करेल. येत्या काळात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’सारखे उपक्रम राबविले जातील.
यावेळी संजीव बजाज म्हणाले, उद्योगाच्या भरभराटीसाठी ‘सीआयआय’ची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. भविष्यातदेखील ही संस्था प्रभावी काम करेल.
आनंद पिरामल म्हणाले, उद्योग वाढीसाठी भांडवलाची उपलब्धता गरजेची आहे. ती मिळाल्यास देशातील तरुणाच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो.