यश मिळण्यासाठी संशोधन, नवकल्पना, प्रयत्न आणि सातत्य आवश्यक- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

मुंबई:- विद्यार्थ्यांनी शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्यासाठी नसून शिक्षणामुळे आपला सर्वांगीण विकास होत आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यश मिळविण्यासाठी संशोधन, नवकल्पना, प्रयत्न आणि सातत्य आवश्यक असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हल्पमेंट रिसर्च संस्थेच्या १६ व्या पदवीदान समारंभात उपराष्ट्रपती श्री. नायडू बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक एस.महेंद्र देव, जयती सरकार, सी. वेकंट, जयमोहन पंडित उपस्थित होते. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना डॉक्टरेट, पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली.

उपराष्ट्रपती श्री. नायडू यांनी संस्थेचे कौतुक करताना सांगितले की, गेल्या तीन दशकांहून अधिक काळापर्यंत इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हल्पमेंट रिसर्च या संस्थेने उच्च शिक्षणाच्या उत्कृष्ट केंद्रांपैकी एक केंद्र स्थापित केले आहे. ही संस्था राष्ट्रीय आणि जागतिक विकासाच्या समस्येवर भाष्य करणारे एक प्रभावशाली केंद्र म्हणून उभे आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज

शिक्षणामुळे व्यक्तीला ज्ञान मिळते आणि जगामध्ये वावरायचे कसे ? याची माहिती होते. कोणत्याही प्रकारचे भेदभाव टाळण्यासाठी सर्व स्तरांवर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. उच्च शिक्षणाची प्रणाली जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनविण्यासाठी भारताने येणाऱ्या काळात पुढे येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील राष्ट्रप्रेमाचे मूल्य वाढविण्याच्या उद्देशाने त्यांना वस्तुस्थिती, इतिहास, प्राचीन संस्कृतीची समृद्धी आणि वारसा यासारख्या गोष्टींची शिकवण देणे आवश्यक असल्याचे श्री. नायडू म्हणाले.

पिकांची व्यापकता वाढविण्यावर भर देणे आवश्यक

श्री. नायडू म्हणाले, येणाऱ्या काळात ज्ञान हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा चालक ठरणार आहे. आपली सशक्त अर्थव्यवस्था आपल्या नागरिकांच्या राहणीमानाची परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. कृषी क्षेत्रातील नफा कमावण्यासाठी आपण संरचनात्मक बदल आणण्यास संकोच करू नये. नॅशनल ॲग्रीकल्चरल मार्केट किंवा ई-नाम यासारखी व्यवस्था निर्माण केल्यामुळे बाजारातील माहिती आणि माहितीच्या चांगल्या वापराद्वारे शेतीचा नफा सुधारण्यात मदत झाली आहे. येणाऱ्या काळात आपण पिकांची विविधता वाढविण्यावर आणि विम्याच्या अंतर्गत पिकांची व्यापकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

कौशल्य उन्नतीकरण आणि नाविन्यपूर्ण उद्योजकतेवर भर देणे आवश्यक

कृषी समवेत विविध क्षेत्रांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आता कौशल्य उन्नतीकरण आणि नाविन्यपूर्ण उद्योजकतेवर भर देणे आवश्यक आहे. स्वयंसेवी रोजगारास प्रोत्साहन देणे, अधिक स्वयंसेवी गटांची स्थापना करून त्यांना सक्षम करणे तसेच गाव आणि लहान उद्योगांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी ग्रामीण भागात शहरी सुविधा पुरविण्याचे स्वप्न पाहिले होते, आता हेच स्वप्न तुम्हा विद्यार्थ्यांनी पूर्ण करायचे आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, रस्त्यावर दिवे, शिक्षण, आरोग्यसेवा आणि दूरसंचार सेवा यासारख्या सोयीस्कर सामाजिक सोयी उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचेही श्री. नायडू यांनी सांगितले.

स्वत:मधील रचनात्मक वृत्ती विकसित करा

श्री. नायडू यांनी सांगितले की, तुमच्यातील पारंपरिक मूल्यांचे सर्वोत्तम संरक्षण करा, नकारात्मकतेपासून दूर रहा, सकारात्मक वृत्ती विकसित करा आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक रहा, शांतताप्रिय आणि सहानुभूतीशील व्यक्ती बना, रचनात्मक वृत्ती विकसित करा आणि आपण जे काही करता त्यामध्ये पूर्णता प्राप्त करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा. सार्वजनिक सेवा, महिलांचे आरोग्य, प्रदूषण, आरोग्य आणि शिक्षणातील समस्या, श्रम आणि आर्थिक बाजार इत्यादी अनेक समस्या भारतासमोर आहेत. अशावेळी संशोधन करत असलेल्या विद्यार्थ्यांनी या अडथळ्यांवर मात कशी करायची यावर मार्ग शोधून काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा, संशोधनाचा, शिक्षणाचा उपयोग आपली अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी होणे आवश्यक आहे. भारताला विकासाच्या मार्गावर जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन, नवीन कल्पना, प्रामाणिक क्रियाशीलता आणि निरंतर देखरेख याचाच उपयोग अधिक होणार असल्याचेही उपराष्ट्रपती श्री. नायडू यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *