चंदनखेडाची स्वप्नातील गावाकडे वाटचाल…

गृहराज्यमंत्री अहीर यांच्याकडून आदर्श गावाची मुहूर्तमेढ

लोकप्रतिनिधी म्हणून सार्वत्रिक विकास करताना काही उदाहरणे घालून द्यायची असतात. काही पथदर्शी प्रकल्प उभारायचे असतात. याच महत्त्वाकांक्षेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेमध्ये येताच २०१४ मध्ये सांसद आदर्श ग्राम ही संकल्पना मांडली…. आणि बघता बघता संपूर्ण भारतामध्ये सातशेच्यावर आदर्श गावांची उभारणी झाली. या आदर्श गावांच्या उभारणी मागील कल्पनाही रोमहर्षक आहे. आपल्या आवडणाऱ्या गावाकडे लोक प्रतिनिधी अधिक लक्ष देतात. किंबहुना ज्यांच्या हातात सत्ता, पैसा आणि यंत्रणा असेल अशा सर्वांनाच आपल्या गावाचा विकास करायची ओढ असते. मात्र सांसद आदर्श ग्राम उभारताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक अट घातली. ती म्हणजे गावाचा विकास अतिरिक्त पैसा खर्च न करता उपलब्ध योजनांच्या मार्फत झाला पाहिजे… आणि या ठिकाणी मग प्रत्येक नेतृत्वाच्या हुशारीचा आणि कल्पकतेचा कस लागला. या अटीवर चंद्रपूरचे खासदार आणि देशाचे कर्तव्यकुशल गृहराज्यमंत्री हंसराज अहिर खरे उतरले. त्यांनी चंदनखेड्याला आपल्या स्वप्नातला गाव बनविण्याकडे वाटचाल सुरु केली आहे.

सांसद आदर्श ग्राम म्हणजे नेमके काय आहे ? हे आधी नीट समजून घेऊ या ! या योजनेअंतर्गत खासदारांनी आपल्या मतदारसंघातील एका गावाची निवड करणे अपेक्षित आहे. या गावामध्ये नागरिकांच्या मागणीनुसार, इच्छेनुसार आणि सहभागातून राज्य आणि केंद्र शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. या एका गावाच्या आदर्श विकासाच्या उदाहरणातून अन्य गावांनी प्रेरणा घेणे अपेक्षित आहे. खासदार हंसराज अहिर यांनी देखील भद्रावती तालुक्यातील चंदनखेड्याच्या विकासातून संपूर्ण मतदारसंघाला विकासाची नवी प्रेरणा दिली आहे. या गावाच्या पायाभूत सुविधांपासून, भौतिकसुविधांपर्यंत आणि सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक स्वास्थ्य सुदृढ करण्याचे काम त्यांनी केले आहे. सांसद आदर्श ग्राम योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वांगीण विकास. गावातील केवळ एका भागाचा, एका वस्तीचा, एका समुदायाचा विकास न करता ‘सबका साथ सबका विकास’ याचे उदाहरण निर्माण करणे म्हणजेच आदर्श सांसद ग्राम तयार करणे होय. चंदनखेडा गावाला फेरफटका मारल्यानंतर नेमकी ही बाब लक्षात येते. केंद्र आणि राज्य शासन अनेक योजना निर्माण करतात. त्यातून शेवटच्या घटकातल्या नागरिकांचे भले व्हावे ही प्रामाणिक इच्छा असते. मात्र योजना पोहोचत नाही. सांसद आदर्श ग्राम म्हणजे गावापर्यंत पोहोचलेल्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी. हंसराज अहिर यांच्यासारख्या निग्रही नेतृत्वाच्या कटाक्षातून झालेली योजनांची साखर पेरणी म्हणजे चंदनखेड्याचा सुखद विकास आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०१४ ला ही योजना सुरू केली. ग्रामीण भारताची माहिती असलेल्या जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिवसाला ग्रामविकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि बघता बघता लोकसभा व राज्यसभा मिळून आठशे खासदारांपैकी सातशेच्या वर खासदारांनी आपल्या मतदारसंघातील एका गावाला आदर्श करण्याचा प्रयत्न सुरू केला. ही मोहीम कमालीची यशस्वी ठरली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील अनेक कल्पक योजनांपैकी ही एक योजना म्हणून आदर्श ग्राम योजना ओळखली जात आहे. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संबंधित खासदाराला ते गाव दत्तक घ्यावे लागते. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी या गावाच्या विकासाला केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची मदत घेत हातभार लावला. सोबतच औद्योगिक जिल्हा असणाऱ्या चंद्रपूर मधील अनेक श्रीमंत कंपन्यांना व खनिज विभागाला आपल्या सामाजिक दायित्व निधीचा हातभारही या गावासाठी लावण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन काही कंपन्यांसोबत खनिज विभागाने देखील चंदन खेड्याच्या विकासाला मदत केली.

चंदन खेड्याला आदर्श ग्राम ही ओळख मिळण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना कामी आल्यात. या गावाचे सर्वात महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे केंद्राच्या स्वच्छता अभियानाचे हे गाव मानबिंदू झाले आहे. या गावात प्रत्येकाकडे शौचालय आहेत. गावांमध्ये स्वच्छ भारत अभियान योजना व सामाजिक दायित्व निधीतून ४३१ शौचालय बांधण्यात आले. प्रधानमंत्री यांच्या आणखी एक जिव्हाळ्याची योजना म्हणून उज्ज्वला गॅस योजना ओळखली जाते. आपल्या माय बहिणीच्या डोळ्यातून धुरामुळे अश्रू बाहेर पडण्याचे दिवस संपावे यासाठी पुढे आलेल्या उज्ज्वला गॅस योजनेतून या गावातील २६७ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन उपलब्ध करण्यात आले आहे.

या गावातील घराघरात विद्युत रोषणाई आहे. सौरऊर्जेचा देखील अत्यंत खुबीने गावात वापर करण्यात आला असून सौर ऊर्जेवरील जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत होण्याचा सन्मानही चंदनखेड्याला मिळाला आहे. गरिबांना घरे मिळावी यासाठी प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळातील विविध घरकुल योजनांचा लाभ देखील या गावातील नागरिकांनी घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना अशा विविध योजनांतर्गत शेकडो घरांची उभारणी गावामध्ये झाली आहे. गावाचे स्वरूपच गेल्या काही वर्षात बदलले आहे. पक्या घरांची वसाहत म्हणजे चंदनखेडा अशी आता ओळख गावाची बनू पाहत आहे.

विद्युत रोषणाई, सौर ऊर्जेचा वापर यासोबतच या गावामध्ये घनकचराद्वारे बायोगॅस प्रकल्प निर्माण करण्याचा प्रयत्नही कमालीचा यशस्वी झाला आहे. सामुहिक स्तरावरील दोन तर व्यक्तिगत दहा बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती गावांमध्ये करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा रोजगारयुक्त करण्यासाठी खासदार हंसराज अहिर झटत असताना त्यांनी चंदनखेड्यामध्ये देखील मधुमक्षिका पालनाचा नवा उद्योग अनेकांसाठी उपजिविकेचे साधन होत आहे. खादी ग्रामोद्योग विभागाच्या मार्फत आणि सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून ९० मधनिर्मिती पेट्यांचे वितरण करण्यात आले आहे. तर आत्मा या उपक्रमामार्फत १०० मधपेट्या व्यवसाय करिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मधाचा व्यवसाय चंदनखेड्यात सुरू झाला आहे. या व्यवसायाची पाळेमुळे गावात हळूहळू घट्ट होत आहे.

पायाभूत सुविधांमध्ये चंदन खेड्यांमधून जाणाऱ्या व चंदन खेड्यांपर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध योजनेतून निधीची तरतूद करण्यात आली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्वोच्च सुविधा देण्यात खासदार अहीर अग्रेसर असून त्यांनी वॉटर कुलर, सोलर वाटर हीटर, लेबर रूम, संरक्षण भिंत आदींसाठी देखील भरीव निधी देऊन हे प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत केले आहे. या गावाच्या पेयजलाच्या व शुद्ध पाणी पुरवठ्याचा प्रश्न देखील त्यांनी खुबीने सोडविला असून १५४ लक्ष रुपयांच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेची कामे सुरु असून आरो शुद्धीकरण यंत्राद्वारे गावकऱ्यांना नियमित पाणी मिळत आहे. आदिवासीबहुल असणाऱ्या या गावांमध्ये शासकीय आदिवासी मुलींचे आश्रम शाळेच्या वसतीगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम पूर्ण झाले असून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय खत साठवण केंद्र तयार करण्यात आले आहे. या छोट्याशा गावात घंटागाडी देखील कचरा उचलण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

महिलांच्या सबलीकरणासाठी येथील प्रत्येक उपक्रमात महिला बचत गटांना सहभागी केले जात असून विविध व्यवसायांसाठी त्यांना मोठ्या प्रमाणात निधी देखील उपलब्ध केल्या जात आहे. या गावाच्या अंतर्गत सर्वोच्च सुविधा देत असताना गावाचे शिवार आणि गावाच्या शेतीकडे देखील लक्ष देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार या योजनेमध्ये चंदनखेड्याने नवा आदर्श निर्माण केला आहे. जलयुक्तची वीस कामे पूर्ण करणाऱ्या या गावांमध्ये ४५ शेत तळे, नाला खोलीकरण, १२ सिमेंट नाल्याची दुरुस्ती व साठवण क्षमता वाढीसाठी खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मामा तलावाचे खोलीकरण, कोल्हापूर बंधाऱ्यांचे काम, तीन सिमेंट नाला बंधारे पूर्ण करण्यात आले आहे. एकूणच गाव आतून-बाहेरून विकसनशील झाले असून खासदार अहीर यांच्या प्रयत्नातून पुढील काळात देखील खासदार निधीतून २५ लाखाची कामे प्रस्तावित आहेत. लवकरच चंदन खेड्याचा विकासाचा सुगंध राज्यभर पोहोचेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. चंदनखेडा आदर्श आणि विकसनशील गाव म्हणून चंद्रपूर जिल्ह्याच्या नकाशावर डौलाने उभे झाले आहे… त्यामुळेच विकास डोळ्याने बघायचा असेल तर चंदन खेड्याची एक भेट आवश्यक झाली आहे.

– जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *