अद्भुत योगायोग!

राजस्थानचे राज्यपाल म्हणून सन्मा. श्री. हरिभाऊ किसनराव बागडे कार्यरत आहेत. ते राजकीय वर्तुळात `नाना’ म्हणून प्रसिद्ध आहेत. हरिभाऊ बागडे यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४५ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चितेपिंपळगाव या गावी मराठा गुर्जर कुटुंबात झाला. ते लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) कार्यकर्ते आणि सदस्य आहेत. १९८० पर्यंत भारतीय जनसंघात त्यांनी आपले राजकीय कार्य केले व त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते झाले. पहिल्यांदा १९८५ मध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून सन्मा. बागडे महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. तर २०१४ व २०१९ साली फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. १९९५-१९९७ दरम्यान महाराष्ट्र सरकारचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री आणि १९९७-१९९९ दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. १२ नोव्हेंबर २०१४ ते २५ नोव्हेंबर २०१९ ह्या काळात त्यांना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा मान मिळाला. २७ जुलै २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.

सन्मा. हरिभाऊ बागडे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री असताना त्यांचा शासकीय स्वीय सहाय्यक म्हणून दोन वर्षे मी कामकाज केले. त्या काळात त्यांनी राज्यात अनेक दौरे केले आणि त्या दौऱ्यांमध्ये मला सहभाग घेण्याचे भाग्य मिळाले. अत्यंत साधा आणि आध्यात्मिक माणूस म्हणजे आमचे नाना! साधी राहणीमान असणारे नाना फक्त आणि फक्त सर्वसामान्यांसाठीच काम करायचे. आताच्या राजकीय लोकांकडे पाहिल्यास `नाना’सारखे व्यक्तिमत्व नेहमीच देवत्वाच्या पलीकडे का गेले? ते लक्षात येते. कशाचाही स्वस्वार्थ नाही, कशाचीही अपेक्षा नाही. वारकरी असलेल्या अशा मंत्र्याकडे काम करण्याची संधी मला मिळाली ती माझ्या सद्गुरू कृपेतून; असे मी मानतो.

गरिबीचे चटके सोसले; पण आईवडिलांच्या संस्काराच्या लेपणाने सगळ्यावर मात करता आली. त्यातूनच सुसंस्कारी-सुसंस्कृत असलेल्या नानांचा सहवास लाभला! आणि काय अद्भुत योगायोग बघा; माझी अर्धांगिनी सौ. मुग्धाविरा सध्या पंढरपूरच्या पायीवारीच्या प्रवासात आहे. त्या प्रवासात एके ठिकाणी राजस्थानचे राज्यपाल सन्मा. श्री. हरिभाऊ किसनराव बागडे उर्फ नाना विठुरायाला भेटण्यासाठी पायी वारी करण्याऱ्या वारकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गेले. त्यांच्याशी संवाद साधला. त्या वारकऱ्यांच्या समूहात माझी पत्नी होती. हे भाग्य प्रत्येकाच्या जीवनात येत नाही. सद्गुरूंच्या कृपेशिवाय असे अद्भुत योगायोग साधले जाणे शक्यच नाही!

-मोहन सावंत

error: Content is protected !!