मुलांना आईवडीलांचे प्रेम कठोर का वाटते?
मला माझा बाप घालून – पाडून बोलतो, माझा सर्वांसमोर अपमानित करतो, मला ओरडतो, मला शिव्या घालतो, सतत माझ्या चुका काढून रागावतो, मला `असं कर’ `तसं करू नको’ असं बडबडत बसतो! मला हवी असलेली वस्तू माझा बाप देत नाही. हे सगळं ऐकून घ्यायला काय मी आता लहान आहे? मीपण चार बुकं शिकलोय, मलाही अनुभव आहे – अक्कल आहे, मलाही मानसन्मान आहे.
बहुतांशी मुलांची आपल्या आई बापाबद्दल अशी तक्रार असते. विशेषतः बापाबद्दल! पण बाप असं नेमकं का वागत असतो? त्या बापाचं आपल्या मुलांवर प्रेम नसतं? तो बाप मुलांचा दुश्मन असतो? त्या बापाला मुलांची प्रगती बघवत नाही? तो बाप कोणासाठी राबत असतो? आपल्याला जे सुख मिळाले नाही ते सुख आपल्या मुलांना मिळावे म्हणून तो मेहनत कष्ट घेत असतो, व्यावहारिक जीवनात वावरताना तो अनेक अपमान पचवत असतो, दुःख गिळत असतो, वेदना सहन करीत असतो. हे सगळं बाप झाल्याशिवाय कळत नाही. तोपर्यंत मुलांना आपल्या बापाबद्दल जे वाटतं ते अनुभव नसल्यामुळेच असतं!
आई – बापाने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून हाताची शीर कापून घेणारी मुलं आहेत. मोबाईलवर गेम खेळू नको म्हणून आईवडील ओरडले म्हणून सहाव्या मजल्यावरून उडी मारणारा मुलगा आहे. `लाडके अशी वागू नकोस, त्यामुळे तुझे आयुष्य बरबाद होईल!’ असं बापाने सांगितले म्हणून विष पिऊन आत्महत्या करणारी मुलगी आहे. बाप ओरडला म्हणून आयुष्यात चुकीचे निर्णय घेणारी मुलं आहेत. आईबापाबद्दल डोक्यात राग घालून मुलं जेव्हा कशीही वागतात तेव्हा जे नुकसान होतं ते मुलांचंच होतं.
मुलांना अति स्वातंत्र्य देणारे आईवडीलही असतात. मुलांनी कोणतीही वस्तू कधीही मागितली तरी ती लगेच आणून देणारे आईवडील मुलांचे नुकसान करीत असतात. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करण्याची मुभा देणारे आईवडीलही हे त्या मुलांचे वैरी असतात. आपली मुलं कुठे जातात, काय करतात, कोणाच्या संगतीत राहतात, ती रात्री किती वाजता घरी येतात, आल्यावर ती शुद्धीत असतात का? ह्याबाबतीत दक्षता न घेणारे आईवडील मुलांच्या नाशास कारणीभूत ठरतात.
एका महिलेला दोन मुलगे होते. त्यातील एक मुलगा दारूच्या व्ययसानात पूर्णतः वाया गेला. आईने आईपणाचे आपले कर्तव्य पूर्ण केले होते. तरीही तो सुधारला नाही. आईने त्याचा विषय सोडून दिला. कारण तिला दुसरा मुलगाही होता. त्याच्यासाठी तिला मेहनत करणं आवश्यक होतं आणि ती करीत होती. शेवटी दारूचे व्यसन असणारा मुलगा मेला. त्या आईच्या डोळ्यातून अश्रू आले नाहीत. ती म्हणाली, `तो त्याच्या कर्माने मेला.’ ती आई निर्दयी होती का? नक्कीच नाही. तिलाही मनापासून वाईट वाटले असेल. पण जो आपल्या कर्माने स्वतःच वाटोळं करून घेतो त्याला का म्हणून रडावं? असा प्रश्न ती स्वतःला विचारात होती. हे सामर्थ्य तिच्यामध्ये आलं कुठून? कारण ती पाडुंरंगाची भक्त होती, वारकरी होती. तिने दोन्ही मुलांवर संस्कार केले होते. मात्र त्यातील एक संगतीमुळे दारूच्या व्यसनात अडकला आणि संपला.
एका महिलेला सहा मुलं होती. त्यातील शेवटचा मुलगा त्या महिलेला अतिशय प्रिय. त्याला वाट्टेल तसं वागण्याची मुभा! प्रत्येकवेळी ती आपल्या मुलाची बाजू घेऊन नवऱ्यालाच अपमानित करायची. शेवटी तो दारूच्या व्यसनात अडकला. चोरी करू लागला. त्या घराची वाताहत झाली. इतर मुलांचे विवाह झाले व ते घर सोडून गेले. बाप काळजीपोटी मरून गेला. शेवटी त्या घरात ती आई आणि तिचा लाडका व्यसनी चोरटा मुलगा राहिले. काही दिवसांनी आईनेही प्राण सोडला. तो लाडका मुलगा शरीराने अशक्त झाला, त्याला अनेक आजार झाले, उपाशी राहू लागला, भटकू लागला. नंतर गायब झाला. काही दिवसांनी त्याचं सडलेलं प्रेत सापडलं. त्या लाडक्या मुलाच्या बर्बादीला कोण जबाबदार होतं?
म्हणून आईवडिलांच्या सल्ल्याचा मुलांनी विचार करायलाच पाहिजे! आईवडिलांशी मुलांना आणि मुलांशी आईवडिलांना संवाद साधता आला पाहिजे. प्रसंगी मुलांना कानफटीत मारता आलं पाहिजे आणि प्रेमाने जवळही घेता आलं पाहिजे. पालक विशेषतः वडिलांचं वर्तन कधीकधी कठोर वाटतं, पण त्यामागे त्यांच्या जबाबदाऱ्या, चिंता आणि अनुभवांचा ठेवा असतो. आईवडील आणि मुलांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा फार आवश्यक आहे. अति प्रेम किंवा अति स्वातंत्र्य दोन्ही मुलांच्या भविष्याला घातक ठरू शकतात. प्रेम हे फक्त लाड करण्याने नाही, तर योग्य मार्गदर्शन व शिस्तीतही असतं. संवाद, समज आणि विश्वास हेच नात्याचे खरे आधारस्तंभ आहेत!
-मोहन सावंत