संपादकीय- लाखो मुली व महिला बेपत्ता होत असताना आम्ही गप्प का?
अत्यंत संवेदनशील विषय जो दुर्दैवी आहे, दुःखद आहे त्याही पेक्षा संतापजनक आहे! कारण तो आम्हा सर्वांच्या अगदी निकटचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. ही गंभीर समस्या देशाची आहेच आणि महाराष्ट्राचीही आहे. आकडेवारी पाहिल्यास त्याची तीव्रता सहजपणे लक्षात येईल. तरीही त्यावर राज्यकर्त्यांकडून, प्रसाशनाकडून उपाययोजना होताना दिसत नाही. महाराष्ट्रात सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, आध्यात्मिक संस्था अनेक आहेत; परंतु त्यांच्याकडूनही ह्या गंभीर प्रश्नाची योग्य अशी दखल घेतली जात नाही; ह्याची चीड येते. म्हणून प्रसार-प्रचार माध्यमातून काही आकडेवारी समोर आली ती पाहूया!
`सकाळ’ने ३० जुलै २०२३ रोजी दिलेले वृत्त पुढीलप्रमाणे.
भारतात २०१९ ते २०२१ ह्या तीन वर्षात १३ लाख पेक्षा जास्त मुली व महिला बेपत्ता झाल्यात. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती संसदेत सादर केली. त्यामध्ये १८ वर्षाखालील २ लाख ५१ हजार ४३० ज्यांना मुली म्हणू आणि १८ वर्षावरील १० लाख ६१ हजार ६४८ महिला आहेत. मध्यप्रदेशात १ लाख ९८ हजार ४१४,
प. बंगालमध्ये १ लाख ९३ हजार, ५११, महाराष्ट्रात १ लाख ९१ हजार ४३३, ओडिशा राज्यात ७ लाख १८ हजार ८७१ आणि छत्तीसगड राज्यात ५९ हजार ९३३ मुली महिला बेपत्ता झाल्या.
`एबीपी माझा’ने ७ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेले वृत्त पुढीलप्रमाणे.
महाराष्ट्रात २०१८ ते २०२२ ह्या पाच वर्षात १ लाख २७ हजार ५८८ मुली व महिला बेपत्ता झाल्यात. National Crime Records Bureau (NCRB) ने दिलेली ही आकडेवारी आहे.
`सामना’ने २५ जानेवारी २०२५ रोजी दिलेले वृत्त पुढीलप्रमाणे.
राज्यात दर दोन महिन्यात चार ते साडेचार हजार मुली – महिला बेपत्ता होतात असं फलटण येथील प्रचार सभेत जेष्ठ राजकारणी व माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी सांगितले.
`पुढारी’ने २८ मार्च २०२५ रोजी दिलेले वृत्त पुढीलप्रमाणे.
पुणे जिल्ह्यात १ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान ७६७ मुली-महिला बेपत्ता. दिवसाला १३ मुली-महिला बेपत्ता.
`लोकसत्ता’ने १९ मार्च २०२५ रोजी दिलेले वृत्त पुढीलप्रमाणे.
महाराष्ट्रातून दरवर्षी ६४ हजार महिला बेपत्ता होतात! असं काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले!
वर्षानुवर्षे मुली आणि महिला बेपत्ता होत असताना किमान आम्ही त्या बातमीकडे गांभीर्याने का पाहत नाही? हा मोठा प्रश्न आहे.
भारतीय संस्कृतीत स्त्रीला खूप मोठे मानाचे स्थान आहे. आदिमाता म्हणून महिषासुरमर्दिनीला आम्ही पुजतो. देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी श्यामचरण मुर्मू आहेत. सर्वच क्षेत्रामध्ये महिलांना मानाचे स्थान आहे. असे असतानाही देशातून ज्या गतीने मुली व महिला बेपत्ता होत आहेत ते मनाला वेदना देणारे आहे. मानवाच्या वैयक्तिक जीवनात आई, पत्नी, बहीण, मुलगी, मावशी, काकू, आत्या, आजी, मैत्रीण ह्या नात्यातून स्त्रीचे महत्व शब्दात न मांडता येणारे आहे. एका बाजूला स्त्री समानतेच्या गोष्टी करायच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेला जिजाऊंना, सावित्रीबाई फुलेंना आदर्श मानायचे; तर दुसऱ्या बाजूला लाखोंच्या संख्येने मुली-महिला बेपत्ता होताना त्याबद्दल बातम्या वाचून हळहळ व्यक्त करण्यापलीकडे कोणतेही ठोस पावलं उचलायची नाहीत; हे दुर्दैवी आहे.
महिलांवर अन्याय अत्याचार हा विषयही तेवढाच गंभीर आहेच! पण मुली महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण समाजव्यवस्थेला काळिमा फासणारे आहे. एवढ्या बेपत्ता झालेल्या मुली महिला नेमक्या जातात कुठे? त्यांना कोण कुठे घेऊन जातं? त्यांचं पुढे काय होतं? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची, प्रशासनाची, न्यायालयांची आहेच; शिवाय जनतेचीही आहे. ह्या विषयावर दररोज चर्चा व्हायला पाहिजे, सर्व यंत्रणांनी त्याबाबत क्रियाशील राहिले पाहिजे.
पाकिस्तानसारखा देश अतिरेक्यांना दहशतवाद्यांना पाठबळ देतो. आमच्या देशात येऊन तेच अतिरेकी क्रूरपणे आमच्या नागरिकांना मारतात. त्याची जबाबदारी स्वीकारत अतिरेक्यांना चून चून के मारले जाते. एवढेच नाहीतर सीमेपलीकडे जाऊन अतिरेक्यांचे तळ बेचिराख केले जातात. आम्हाला त्याचा भारतीय नागरिक म्हणून अभिमान आहेच! पण आमच्या आया-बहिणी-मुली बेपत्ता होत असताना तेवढीच तत्परता का दाखविली जात नाही? हा प्रश्न निर्माण होतो.
ज्या घरची मुली- महिला बेपत्ता होते त्या घराचं घरपण निघून जाते हो! तिचे नातेवाईक टाहो फोडून रडतात. उद्या ही वेळ कोणावरही येऊ शकते. म्हणूनच सर्वसामान्य जनतेने हा प्रश्न हातात घेतला पाहिजे. आज सोशल मीडियाचे माध्यम बहुतांशी लोकांच्या हातात आहे. त्याद्वारे आम्ही आमच्या कुवतीनुसार हा प्रश्न लावून धरू शकतो; जेणेकरून राज्यकर्त्यांना त्याबाबत ठोस भूमिका घ्यावी लागेल.
जोपर्यंत आपल्याला वैयक्तिक स्तरावर झळ पोहचत नाही तोपर्यंत आम्हाला त्यातील वेदना, दुःख कळत नाही. जोपर्यंत दुसऱ्याचे घर जळते तोपर्यंत आम्हाला काळजी करावीशी वाटत नाही. पण जेव्हा आपले घर जळते तेव्हा मात्र आपली जी वाताहत होते ती सगळ्यात मोठी असते. त्यामुळे हा गंभीर प्रश्न प्रत्येकाचा आहे; हे लक्षात घ्यायला हवे. ज्यामार्गाने शक्य असेल त्यामार्गाने आम्हाला ह्या प्रश्नासाठी लढता आले पाहिजे. विशेषतः मुलींना – महिलांना सक्षम, सदृढ आणि सामर्थ्यशील करण्यासाठी समाजाने आणि समाजातील प्रत्येक घटकाने पुढे आले पाहिजे. मुली-महिला बेपत्ता होत असताना आज आम्ही संवेदनशीलता दाखवू शकलो नाही तर आम्हाला येणारा काळही माफ करणार नाही. देशाच्या आणि मानवी जीवनाच्या सर्वांगिण विकासासाठी स्त्रीचे महत्व ज्याला ज्याला समजले, तो लाखोंनी बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या- महिलांच्या गंभीर प्रश्नाला नजरेआड करणार नाही.
-नरेंद्र हडकर