शक्तीपीठ महामार्ग पर्यटनाच्या वृद्धीसाठी नव्हेतर मायनिंग आणि कोळसा वाहतूकीसाठीच! -डॉ. जयेंद्र परुळेकर

सावंतवाडी:- “शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडण्यात यावा; अशी मागणी आता सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार दिपक केसरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. यातूनच हे सिद्ध होत आहे की हा महामार्ग पर्यटनाच्या वृद्धीसाठी नसून मायनिंग आणि कोळसा वाहतूकीसाठी असणार आहे. विदर्भातून कोळसा आणण्यासाठी हा महामार्ग असण्याची शक्यता आहे!” असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.

परुळेकर यांनी म्हटले आहे की, मळेवाड ते आजगाव धाकोरे या नऊ गावातील प्रस्तावित जिंदाल या कंपनीचा महाकाय मायनिंग आणि स्टील स्मेल्टिंग प्रकल्प तसेच नाणोस मधील प्रस्तावित तिंबलो कंपनीचा मायनिंग प्रकल्प अशा अनेक विनाशकारी प्रकल्पांसाठी हा शक्तीपीठ महामार्ग नियोजित करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. गेळे ते केसरी फणसवडे असा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बोगदा करणार असल्याचे आमदार केसरकर सांगत आहेत, ही जनतेची दिशाभूल आहे. कारण तसा बोगदा करणार असल्यास गेळे, आंबोली, नेनेवाडी, उडेली, फुकेरी, घारपी, असनिये, झोळंबे, तांबोळी, डेगवे, बांदा इत्यादी बारा गावांमध्ये जमीन सर्वेक्षण प्रक्रिया का राबविण्यात आली?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास ३६ किमी लांबीच्या आणि १०० मीटर रुंदीचा जमिनपट्टा अधिग्रहण करण्यासाठी प्रशासन का हालचाली करत आहे? याचाच अर्थ जनतेची दिशाभूल करून त्यांना गाफील ठेवून जमीन अधिग्रहण करण्याचा हा डाव आहे. या महामार्गासाठी लाखो वृक्षांची कत्तल होणार आहे; हे निश्चित आहे! पण जनतेत त्या विरोधात रोष निर्माण होऊ नये म्हणून ही दिशाभूल सुरू केली आहे; असा आरोपही डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.

error: Content is protected !!