गडनदी वरील बंधाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी अडविले!

ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांच्या मागणीनुसार
गडनदी वरील बंधाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी अडविले!

तळेरे (संजय खानविलकर)- कणकवली येथील गडनदी वरील केटी बंधाऱ्यांमध्ये लोखंडी प्लेट्स टाकून पाणी अडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी; अशी मागणी ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी जलसंपदा विभागाकडे केली होती. अखेर त्याची दखल घेऊन कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठान नजीकच्या बंधाऱ्यावरती प्लेट्स टाकून पाणी अडविण्याच्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली.

सध्या उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून उन्हाळ्यात संभाव्य पाण्याची टंचाई भासू नये. यासाठी `पाणी आडवा पाणी जिरवा’ ही मोहीम अधिक व्यापकपणे राबविण्याची गरज व्यक्त करुन कणकवली गडनदी वरील कनकनगर तसेच आचरेकर प्रतिष्ठान नजीक असलेल्या केटी बांधणाऱ्यामध्ये तातडीने प्लेट्स टाकून पाणी अडविण्यात यावे; तसेच या नदीच्या मार्गावरील अन्य गावांमध्ये बांधलेल्या केटी बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्याची मोहीम राबविण्यात यावी; जेणेकरून दिवसेंदिवस खालावत चाललेली नदी पात्राची पाण्याची पातळी वाढवण्यासाठी मदत होईल. तसेच जमिनीतील- भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. नदी किनारा शेजारील विहिरींच्यादेखील पाणी पातळीत वाढ होईल. गुरे जनावरे,पाळीव प्राणी, जंगली प्राणी यांचीदेखील पाण्याअभावी परवड होणार नाही. त्याचबरोबर नदी काठच्या गावांना उन्हाळी भाजीपाला व इतर पिकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी मदत होईल असे मत व्यक्त केले होते.

यासाठी गडनदी वरील सर्व केटी बंधाऱ्यांवरती प्लेट्स टाकून पाणी अडविण्याची मोहीम राबवावी; अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी केली. जलसंपदा विभागाकडे करून त्याबाबतचा पाठपुरावा ल. पा. विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम यांच्याकडे केला होता.

अखेर या मागणीची दखल घेऊन आचरेकर प्रतिष्ठान शेजारील केटी बांधणाऱ्या वरती प्लेट्स टाकून पाणी अडविण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली. याबाबत ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक तसेच संघटनेचे जिल्हा निरिक्षक मनोज तोरसकर यांनी प्रत्यक्ष बंधाऱ्याच्या स्थळी भेट देऊन बंधाऱ्याच्या प्लेट्स टाकण्याच्या कामास सुरूवात केलेल्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच कणकनगर आणि गडनदीवरील अन्य गावातील बंधाऱ्यावरतीही प्लेट्स टाकून पाणी अडविण्यात यावे; अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page