श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस – ३०
🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -३०🌟
(सांगता भाग☘️🌼 )
🔆 श्रद्धावानांचे पथदीप 🔆
१. आद्यपिपा
२. चौबळ आजोबा
३. साधनाताई
४. मीनावैनी
१. आद्यपिपा :
आद्यपिपा = एक भक्तिपूर्ण प्रवास
-समीर दत्तोपाध्ये
जन्म आषाढी एकादशी १९३३ आईचे नाव -लक्ष्मी
वडिलांचे नाव -पांडुरंग
वडिल पांडुरंगरावांची संतती जगत नसल्यामुळे १९१५ साली ते शिरडीस साईनाथांच्या दर्शनासाठी गेले व त्यानंतर सर्व अपत्ये सुखरुप राहिली.
काकांच्या जन्मानंतर त्यांच्या आठवणीतील पहिले शिरडी दर्शन १९४० साली झाले. त्याच रात्री द्वारकामाईत बसून काकांच्या वडिलांनी त्यांना उदीचे महत्व समजावून सांगितले. त्या दिवसापासून काकांची साईभक्ती अत्यंत दृढ झाली.
१९४५ साली शिरडीस गेले असताना द्वारकामाईमध्येच काकांची माधवराव देशपांड्यांचे पुत्र उद्धवराव व म्हाळसापतींचे पुत्र मार्तंडबाबा ह्यांच्याशी भेट झाली व त्या वर्षापासून काकांनी श्री साई सच्चरिताचे दरवर्षी कमीतकमी चार सप्ताह करण्याचा निश्चय केला; रामनवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी व दसरा. ह्यात कधीही खंड पडला नाही.
विवाह – ७ मे १९६० रोजी प. पू. सुचितदादा व समीरदादांच्या मातोश्रींशी (सुनंदा) काकांचा विवाह झाला व स्वप्नदृष्टांतानुसार साईंच्या आज्ञेने त्यांचे नाव शुभदा ठेवले.
विवाहानंतर पत्नीच्या संपूर्ण सहकार्यामुळे काकांच्या भक्तिप्रवाहाची जोरदार वाटचाल सुरु झाली. काका सदैव आपल्या सहधर्मचारिणीच्या सहकार्याचे तोंड भरून कौतुक करत असत.
काकांच्या जन्मदात्या आईचे निधन १८ नोव्हेंबर १९४१ साली झाले होते. आईच्या वियोगाचे दुःख हळुहळु साईभक्तित रुपांतरीत होऊ लागले. काका शाळेतील काही मित्रांबरोबर अनेकवेळा शंकराच्या मंदिरात संध्याकाळी भजनासाठी जात असत. एकदा एस.एस.सी. (मॅट्रीक) पास झाल्यानंतर काका शंकराच्या देवळात गेले असताना तेथे साईस्तवनमंजिरी वाचत बसले होते. वाचून पूर्ण होताच एक वृद्ध ब्राह्मण त्यांच्या समोर येऊन उभा राहिला व त्यांनी विचारले, “बाळ, तुला काय हवे आहे ?” काकांनी उत्तर दिले, “मला देहधारी साई हवा आहे.” तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, “मग तू गृहस्थाश्रमी झाल्यानंतर तिर्थक्षेत्रांच्या १०८ यात्रा व संतस्थानांची १०८ दर्शने पूर्ण कर.” एवढे बोलून तो वृद्ध ब्राह्मण हसू लागला. काकांनी विचारले, “पण मी सामान्य माणूस आहे. देहधारी साईचे रुप वेगळे असेल तर ओळखणार कसे?” तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, “त्यावेळेस मीच तुला साक्ष पटवून देईन.” काका त्या ब्राह्मण गृहस्थांच्या व्यक्तिमत्वाने खूपच भारावून गेले होते. त्या ब्राह्मणाच्या सांगण्यानुसार त्यांनी सर्वकाही करण्याचे ठरविले. विवाहानंतर त्यांनी नोकरी व प्रपंच ह्यातून वेळ काढून सतत संतस्थानदर्शन व तिर्थक्षेत्र यात्रा ह्यांचा झपाटा लावला. शिरडी, पंढरपूर, गोकर्ण, महाबळेश्वर, तिरुपती, गिरनार, परळीवैद्यनाथ, घृष्णेश्वर, रामेश्वरम्, प्रयाग, कन्याकुमारी, इत्यादि तिर्थक्षेत्रांच्या व आळंदी, देहू, गणेशपुरी, हुमणाबाद, गगनबावडा, सासवड, पंतबाळेकुंद्री स्थान, कलावती आईंचे हरिमंदिर, सिद्धरुढ स्वामींचा मठ, पावस, शेगाव अशा संतस्थानांच्या त्यांनी अनेकवार यात्रा केल्या.
इ.स. १९९६च्या पहिल्या रसयात्रेमध्ये सर्व मंडळींना घेऊन बापू शिरडीतील द्वारकामाईत गेले होते. तिथून मग बापू सर्वांना घेऊन शिरडीतील म्हाळसापतींची समाधी, कनीफनाथ मंदिर, इ. स्थळे दाखविण्यासाठी निघाले. काका मात्र द्वारकामाईतच बसून राहिले. त्यावेळेस प. पू. सुचितदादांनी काकांना साईस्तवनमंजिरी पोथी दिली व तुमच्याकडे ठेवा म्हणून सांगितले. काका श्री साईसच्चरिताचा एक अध्याय वाचून उभे राहिले व द्वारकामाईतील बाबांच्या तसबीरीसमोर लोटांगण घालण्यासाठी गेले. तिथे धुनीजवळ एकाएकी काकांच्या खिशातून दादांनी दिलेली साईस्तवनमंजिरीची पुस्तिका खाली पडली. ती उचलताना “अरे, ही वाचण्यासाठीच तुला मी इथे थांबवले आहे.” असा आवाज काकांना ऐकू आला. त्यासरशी काकांना शंकराच्या मंदिरातील ती जुनी गोष्ट आठवली व ते खाली उतरून स्तवनमंजिरी पठणास बसले. काकांचा तो पूर्ण दिवस व रात्र बेचैनीत गेली. सुचित आपणास काहीच सांगत नाही. मीनावनी, चौबळ आजोबा वगैरे मंडळीतर निःसंदिग्धपणे बापूंविषयी सांगत आहेत व आपल्याला अजून काहीच प्रचिती येत नाही ह्या विचारांनी काका खंतावले होते.
असाच काही काळ द्विधा मनःस्थितीत गेल्यानंतर १९९७च्या गुरुपौर्णिमेला नेहमीप्रमाणे श्रीसाईसच्चरिताचा सप्ताह केल्यानंतर रात्री झोपताना काकांनी साईनाथांना स्पष्ट मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना केली. झोपेत त्यांना स्वप्नामध्ये तो शंकराच्या देवळातील प्रसंग परत तसाच्या तसा दिसला. काकांनी सकाळी उठताच शांतपणे निश्चय केला की आता लवकरात लवकर १०८ संख्या पूर्ण करायचीच. त्यानंतर पहिल्या अश्वत्थ मारुती उत्सवाच्या दिवशी हनुमंताच्या मूर्तीस शेंदूर लावून बापू आपल्या आसनावर बसताक्षणीच काका एका पूर्ण वेगळ्याच भानरहित अवस्थेमध्ये गेले. त्यांना शंखचक्रबाणधारी स्वरूप दिसत होते. काकांना हाताला धरून चौबळ आजोबा स्टेजकडे गेले. हनुमंताच्या मूर्तीसमोर येताच काका पूर्ण भानावर आले होते. काकांच्या मनाची परत एकदा द्विधा मनःस्थिती सुरु झाली. परंतु गुरुपौर्णिमेच्या रात्री झालेला जुन्या घटनेचा स्वप्नदृष्टांत आठवून काकांनी निर्णय घेतला की अगदी काहीही अनुभव आला वा काहीही दिसले तरीही जोपर्यंत म्हातारा ब्राह्मण खूण पटवणार नाही तोपर्यंत आपण धीर धरायचा.
पहिल्या अश्वत्थ मारुतीचा तो दिवस…
१९९९ साली त्यांची ही संख्या पूर्ण झाली. प.पू. अनिरुद्ध बापूंशी प. पू. सुचितदादांचे मित्र म्हणून १९८५ साली त्यांची ओळख झालेली होती व १९९५ पासून बापूंच्या भक्तिमार्गातही काका आलेले होते. पण सर्वात महत्वाचा निर्णायक क्षण ठरला तो इ.स. १९९९च्या धर्मचक्र स्थापनेच्या दिवशी. त्या दिवशी जुईनगर येथे अरुंधती मातेने श्री विद्यामकरंद गोपीनाथ शास्त्री पाध्ये ह्यांच्या तसबीरीचे अनावरण केले. त्यांचा चेहरा बघताच काकांना शंकराच्या देवळातील वृद्ध ब्राह्मण तो हाच ह्याची पूर्णपणे खात्री पटली व काका पूर्णपणे निश्चिंत झाले. त्यानंतर लवकरच व्यंकटेश महोत्सवामध्ये काकांना जप चालू असतानांच पूर्णपणे साईरुपाचे दर्शन झाले व काकांनी अनेक वर्षांचा ‘ॐ साईनाथाय नमः’ हा चालू असलेला जप ९ मे २००० पासून ‘ॐ साईनाथाय अनिरुद्धाय नमः’ असा सुरु केला.
१३ नोव्हेंबर २०००ची रात्र काकांसाठी व सर्व बापूभक्तांसाठी अत्यंत भाग्याची ठरली. त्याच दिवशी संध्याकाळी बापूंनी काकांची पिपिलीका पांथस्थ पदावर नियुक्ति करून कार्य सुरु करण्याची आज्ञा दिली होती. त्याच रात्री मध्यरात्री झोपेतून काका एकाएकी उठून बसले व त्यांना दुसरा अभंग स्फुरला. हा अभंग म्हणजे काकांची बापूंच्या चरणधुळीमध्ये लोळण्याची आत्यंतिक इच्छा.
त्यानंतर मात्र काकांचा आध्यात्मिक प्रवास एका वेगळ्याच उंचीवरून अत्यंत जोरदारपणे सुरु झाला. २००४च्या रामनवमीच्या दिवशी रात्री उत्सव संपवून प. पू. बापू हॅपी होममध्ये रात्री दीड वाजता परत आले. जेवणानंतर बापू, सुचितदादा, काका व मी गप्पा मारीत बसलो होतो. बरोबर सोडे तीन वाजता बापू झोपाळ्यावरून उठून उभे राहिले व काकांना म्हणाले, “आज आताच्या आता तुम्ही समीरला गुरुमंत्र द्या.” काका म्हणाले, “तुमची आज्ञा आहेच, पण समीरला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार आहे असे वाटत नाही.” तेव्हा बापू हसून म्हणाले, “अरे, जेव्हा हजारो मंडळी आमच्या तिघांच्या जयजयकारानंतर समीरच्या आधी तुझा जयजयकार करतात तेव्हा का ऑब्जेक्शन घेत नाहीस ?” काका म्हणाले, “देवा तुझ्याशी वादात कोण जिंकणार ? तू सांगशील ते करतो.’ बापूंनी काकांना डोळे बंद करून श्रीसाईसच्चरित उघडण्यास सांगितले व एक बोट पानावर कुठेही ठेवण्यास सांगितले. ती ११व्या अध्यायातील १५२वी ओवी होती. तीच ओवी बापूंनी काकांकरवी मला गुरुमंत्र म्हणून दिली.
पुरेल अपूर्व इच्छित काम । व्हाल अंती पूर्ण निष्काम ।। पावाल दुर्लभ सायुज्यधाम । अखंड राम लाधाल ।।
बापूंचा खेळ पाहून मी स्तिमीतच झालो. माझा दादा हा बापूंचा शिष्य, माझे वडिल सुचितदादांचे शिष्य आणि मी काकांचा शिष्य (माझ्या वडिलांचा). त्यानंतर काकांनी बापूंची पाय धरून विनवणी केली, “एक पुत्र माझा गुरु झाला व दुसरा पुत्र माझा शिष्य झाला. पण आता मात्र पुढे कुणाचेही गुरुत्व मला देऊ नका. व्यंकटेश जपाच्या दिवशी मी तुमच्याकडे एकच मागितले होते की मला मानसन्मान, प्रसिद्धी व मोठेपणा नको. आजही मी परत तेच मागतो आहे. माझी अंतयात्रासुद्धा कुणा थोर भक्ताची म्हणून नाही तर फक्त ‘सुचितचा बाप’ म्हणूनच निघू दे कारण तीच माझी सुखद गोष्ट आहे.” बापू म्हणाले, “आतापर्यंत सगळं तुझ्या मनासारखं झालं ना !” तेव्हा काका पटकन उद्गारले, “हो, पण ९६ पासून ९९ पर्यंत मला का रखडवलेस ?” बापू म्हणाले, “मी रखडवले नाही. तूच तुझ्या चुकीच्या गणितांमुळे रखडलास. तुझी १०८ स्थानांची बेरीज ९७ रामनवमीलाच पूर्ण झाली होती. पण गुरुवारच्या प्रवचनस्थळाला तू तुझ्या बेरजेत न मोजल्यामुळे तुझ्या मनातील १०८ ही संख्या मात्र पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळेच त्या स्वप्नातील म्हाताऱ्याचा म्हणजेच गोपीनाथ शास्त्री पाध्यांचा फोटो ९७च्या रामनवमीला पाहूनही तू ओळखू शकला नाहीस, तुला खूण पटू शकली नाही, कारण रामनवमीच्या वेळेचा फोटो कोट पगडीतला होता व तुझ्या अनुभवातील म्हातारा शेंडी व शालधारी होता.” काका एकदम बापूंच्या चरणांवर जाऊन पडले व त्याच दिवसापासून काकांनी अखंड जपास सुरुवात केली.
काकांच्या आध्यात्मिक प्रवासातील बऱ्याच घटनांचा साक्षीदार बनण्याचे मला मिळाले पण काकांनी मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, बापूंनी ज्या वेळेस माझ्यासमोर काकांना सांगितले की आता काही तासच उरले आहेत तेव्हा काकांनी बापूंच्या हातात दिलेला माझा हात.
॥ हरि ॐ ।।
( कृपासिंधू मॅगझिन – सप्टेंबर २००७)
२. चौबळ आजोबा :
🔅ज्यांना वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे सन् १९१७ साली सद्गुरु श्रीसाईनाथांच्या मांडीवर बसण्याचे भाग्य लाभले ते श्रेष्ठ भक्त म्हणजे श्री. शंकर हरिभाऊ चौबळ अर्थात चौबळ आजोबा.
🔅 १९९६ साली त्यांना सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या रूपात पुन्हा देहधारी सद्गुरुची प्राप्ती झाली आणि त्यांचे जीवन सुखाने व आनंदाने मोहरून गेले.
🔅श्री. चौबळ आजोबा रोज १६००० वेळा साईनामाचा जप करीत असत. त्यांच्या मृत्युसमयी सद्गुरु श्रीअनिरुद्ध त्यांच्या शेजारी बसून होते. मृत्युसमयी चौबळ आजोबांच्या मुखात अखंड साईनामाचे आवर्तन सुरू होते.
🔅सद्गुरु श्रीसाईनाथांना व सद्गुरु श्रीअनिरुद्धांना एकाच जन्मात प्रत्यक्ष बघणारे एकमेव साक्षिदार, चौबळ आजोबा म्हणजे सद्गुरु भक्तीतील एक श्रेष्ठ रत्न.
३.साधनाताई
🔅उच्चविद्याविभूषित साधनाताई उपाध्ये ह्या विल्सन कॉलेजच्या मराठी विभागाच्या प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. इंग्लिश मिडियममधून शिक्षण घेऊनही त्यांचं मराठीवर प्रभुत्व होत आणि ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास होता.
🔅अवघा बापू मिळावा यासाठी सारी साधने हवीत, तो नसेल तर मात्र काहीच नको हा त्यांचा भाव. साधने गौण आणि साधना मुख्य हीच त्यांची प्रमुख खूण होती.
🔅श्री अनिरुद्धांच्या वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे १९६४ साली अनिरुद्धांची आजी शकुंतला पंडीत अनिरुद्धांना वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात घेऊन गेली असताना मंदिरामध्ये अनिरुद्धांची साधनाताईशी भेट झाली. त्यावेळी बाळ अनिरुद्धाने साधनाताईंना एक मोरपिस भेट म्हणून दिले होते.
* त्या घटनेची ओळख साधनाताईंना १९९८ साली सौ. मीनावैनी दाभोलकर यांच्या घरी झाली. एवढंच नाही तर साधनाताईंना विठ्ठल मंदिरात १९६४ साली मोरपिस देणारा बाळ अनिरुद्धच आज सद्गुरु म्हणून नावारूपाला आला आहे, ह्याची साक्ष पटली.
* ही घटना सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या उपस्थितीत साईनिवास येथे घडली तेव्हा श्रीअनिरुद्धांनी मोठ्याने हास्य करून याची साक्ष पटवली.
🔅 ज्ञानमार्गापेक्षा भक्तिमार्गच सहज व सोपा कसा ह्याच्या श्रेष्ठ साक्षिदार म्हणजे भक्तश्रेष्ठ साधनाताई.
४.मीनावैनी:-
🔅एक आदर्श गृहिणी, प्रेमळ पत्नी, सद्गुरु श्रीसाईनाथांची आणि सद्गुरु श्रीअनिरुद्धांची निष्काम भक्त.
🔅एक निष्ठावान वानर सैनिक कसा असावा याचा उत्तम आदर्श म्हणजे मीना वैनी
🔅१९९८ साली सद्गुरु श्रीसाईनाथांनी, हेमाडपंतांना दिलेल्या तीन वस्तुंचा (शाळीग्राम, त्रिशुळ, रुद्राक्षाची माळ) सांभाळ करून त्या वस्तुंची खूण पटताच पुन्हा त्या वस्तु सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या हाती देण्याचं भाग्य लाभलं ते मीनावैनींना व त्यांचे पती आप्पासाहेब दाभोलकर यांना.
🔅त्यांनी सद्गुरु श्रीअनिरुद्धांवर विरचित केलेले अभंग म्हणजे मीनावैनींच्या भक्ती मार्गातील वरिष्ठत्वाची साक्ष देते. ‘वैनी म्हणे’ ह्या सीडीद्वारे त्यांचे हे अभंग प्रकाशित झाले आहेत.
🔅आजही त्या तुळशी वृंदावन रुपात श्रीसाईनिवास येथे कायमचे वास्तव्य करुन भक्तिमार्गात भक्ताचा उत्कर्ष कसा होतो त्याची खूण पटवीत आहेत.
🔅”मी ना – जिच्यात नावातच मी पणा नाही आणि वैनी – वैंकुठ निवासिनी – जी सातत्याने “त्या” सावळ्याच्या चरणा ठायी रममाण झाली, आणि सदैव वसते ती मीनावैनी !
दाभोळकर कुटूंबीयांच्या अपार साई प्रेमाने मला श्रीसाईसच्चरिताचे वेड लावले. मला सदगुरु कसा असतो , कोण असतो ह्याची दिशा गवसली आणि आयुष्याला सदगुरुंचा पावन स्पर्श होऊन मी पुनीत झाले. अवघे जीवनच बदलले- संपूर्ण कायापालट हा फक्त सदगुरुच करू शकतो. श्रीसाईसच्चरित वाचनाची सवय होतीच , मीना वैनींनी आग्रहाने पंचशील परीक्षा द्यायला प्रेरीत केले आणि खर्या अर्थाने श्रीसाईसच्चरिताची गोडी लावली, अध्याय सोप्या भाषेत समजावून द्यायच्या आणि श्रावणातल्या पारायणाच्या वेळी रात्र जागवताना पंचशीलच्या अभ्यासाची उजळणी ही करून घ्यायच्या. आजही “साई-निवास”च्या पायर्या चढताना त्या हळूवार आठवणी जाग्या होतात आणि वाटते की मीना वैनी आता दिसतील, परत त्याच अपार प्रेमाने साईबाबांच्या आणि बापूंच्या गोष्टी सांगतील. अजूनही तुलसीवृंदावनाच्या येथे बसले की त्यांची प्रेमळ मूर्ती डोळ्यांसमोरून हलत नाही. भक्तीमार्गातल्या अनेक अडचणींना आपसूक येथेच उत्तर मिळते असा माझा अनुभव आहे.
माझे सदगुरु डॉक्टर अनिरुध्द जोशी म्हणजेच आम्हां सर्वांचे बापू मीना वैनींच्या साईनाथांवरील प्रेमाबद्दल खूप हृद्य आठवणी सांगत. बापू सांगत मीना वैनीनीं साईसच्चरित नुसते वाचलेच नाही तर खर्या अर्थाने आचरणात आणले होते. भक्तीचे खरे सामर्थ्य , ताकद ही सदगुरुंचे नियम पाळण्यात असते, स्वत: परमात्मा हा मानव बनून पृथ्वीतलावर अवतरला तरीही “तो” स्वत: देखील त्याच्या आईने – आदिमाता चण्डिकेने आणि त्याच्या परम पित्याने घालून दिलेले नियम कसोशीने पाळतो. परमात्मा राम बनून भारतवर्षात अवतरला तेव्हा “तुला मानवासारखंच वागायचे आहे, तुला दिव्य दृष्टी वापरायची नाही” कारण तरच रावणाचा मानव म्हणून वध करता आला असता हा अवतार कार्याचा मूळ हेतू होता, म्हणजे येथे सीता मातेला रावणाने पळवून नेले हे दिव्य दृष्टी वापरून कळू शकले असते , तरीही परमात्मा राम तसे करीत नाही. कारण “तो” आपल्या आईचे नियम पाळतो. खरे सामर्थ्य असते त्या आदिमातेचे नियम पाळण्यामध्येच, त्या सदगुरुंचे ,त्या दत्तगुरुंचे नियम पाळण्या मध्येच आणि साईचरित्रामध्ये आम्ही काय शिकतो ? तर हेच नियम पाळायचे शिकतो.”
श्रीगुरुचरणमासनिमित्त सद्गुरु श्रीअनिरूद्धांच्या गुणसंकीर्तनाचे ३० भाग पूर्ण झालेले आहेत. श्री अनिरुद्धांचे गुणसंकीर्तन म्हणजे कधीही न संपणारा अथांग भक्तिभाव चैतन्याचा महासागरच..
बापूंचा श्रद्धावानांसोबत झालेला प्रवास ,संस्थेत चालणाऱ्या विविध सेवा आणि उपक्रम यांची माहिती नवीन श्रद्धावानांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि श्रीअनिरुद्धांच्या ह्या सुवर्णकालातील अविस्मरणीय आठवणींचे सिंहावलोकन करण्यासाठी हा एक छोटासा प्रयास.. गुणसंकीर्तनातील संकलित माहितीत काही त्रुटी राहिली असल्यास क्षमस्व.🙏
ही तीस भागांची पुष्पमाला नंदाअनिरुद्धांच्या चरणी अर्पण करून ह्या गुणसंकीर्तन मालिकेची सांगता करीत आहे..
श्रीराम श्रीराम!
🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺
🙌🙌नाथसंविध्🙌🙌
🙌🙌नाथसंविध्🙌🙌
🙌नाथसंविध्🙌
साभार – WhatsApp