`अनिरुद्ध पहाट-१२’ गुरुगीतेचे एक एक अक्षर परम मंत्र आहे!
।। हरि ॐ।।
भोलेनाथ शिवशंकर सद्गुरुंचं गुणसंकिर्तन ज्या गीतेमध्ये करतात ती गीता म्हणजे गुरुगीता! ही गुरुगीताच साक्षात सद्गुरुंचे नामस्मरण, सद्गुरुंचे गुणसंकिर्तन आपल्याकडून करून घेते. ज्यामुळे परमात्मारुपी सद्गुरुंच्या सामर्थ्याची पवित्र स्पंदनं प्राप्त होतात. गुरुगीतेचे एक एक अक्षर परम मंत्र आहे. दुसरे अनेक मंत्र ह्याच्या सोळाव्या भागाचीही बरोबरी करू शकणार नाहीत. श्रीगुरुगीतेचे सामर्थ्यच असे की श्रीगुरुगीता काळाच्या व मृत्युच्या भयापासून भयप्राप्ती करून देते. सर्व संकटांचा नाश करते. श्रीगुरुगीताजपाने सर्व प्रकारच्या महाव्याधी दूर होतात.
एव श्रुत्वा महादेवि, गुरुनिंदां करोति यः। स याति नरकं घोरं, यावच्चंद्रदिवाकरौ॥१०१॥
हे महादेवी, हे गुरुमहात्म्य ऎकूनही जो गुरूची निंदा करील तो, जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत म्हणजे जगाच्या अंतापर्यंत घोर नरकात जाऊन पडेल.
यावत्कल्पांतको देहस्तावदेव गुरुं स्मरेत्। गुरुलोपो न कर्तव्य:, स्वच्छंदो यदि वा भवेत्॥१०२॥
देहाचा नाश होईतो म्हणजेच देह आहे तो गुरूचे स्मरण केलेच पाहिजे. स्वतःचा छंद लागला, साक्षात्काराचा अनुभव आला तरीही गुरूचे स्मरण चुकवू नये.
हुंकारेण न वक्तव्यं, प्राज्ञैः शिष्यैः कथंचन । गुरोरग्रे न वक्तव्यमसत्यं च कदाचन ॥१०३॥
शहाण्या बुद्धिमान शिष्याने गुरुसमोर हुंकार देऊन, (हुं, अं, हो, हां म्हणत) एकेक्षरी बोलू नये. नीट शब्दोच्चार करून बोलावे. मान हलवून, हातवारे करून, सूचना देत, हुंकारत उत्तरे देऊ नयेत. तसेच गुरुसमोर असत्य भाषण करू नये.
गुरुं त्वं कृत्य हुं कृत्य, गुरुं निर्जित्य वादतः। अरण्ये निर्जले देशे, स भवेद् ब्रह्मराक्षसः॥१०४॥
गुरुशी, हुं अशा एकरी शब्दात बोलू नये. अनादर यत्किंचितही दाखवू नये. वादामध्ये गुरूला जिंकून त्याचा पाडाव करू पाहाणारा निर्जल अरण्यात ब्रह्मराक्षस होतो.
मुनिभिः पन्नगैर्वाऽपि, सुरैर्वा शापितो यदि। कालमृत्युभयाद्वापि, गुरू रक्षति पार्वती॥१०५॥
हे पार्वती, मुनि, नाग, सर्प किंवा देवदेवतांनी जरी शापिले तरी त्या शापापासून, तसेच काळ, मृत्यू ह्यांच्या भयापासून गुरू रक्षण करतो.
मंत्रराजमिदं देवि, गुरुरित्यक्षरद्वयम्। स्मृतिवेदार्थवाक्येन, गुरुः साक्षात्परं पदम्॥१०७॥
हे देवि, गुरू ही दोन अक्षरे तर मंत्रांचा राजा होत. श्रुतिस्मृतींच्या वाक्यांवरून गुरू साक्षात परमपद, गुरू साक्षात परब्रह्म हे सिद्ध होते.
श्रुति-स्मृति अविज्ञाय, केवलं गुरुसेवकाः। ते वै संन्यासिनः प्रोक्ता, इतरे वेषधारिणः॥१०८॥
श्रुतिस्मृति न जाणणारे, वेदान्ताचा अभ्यास न करणारे देखील केवळ गुरुसेवा करून ‘संन्यासी’ ह्या संज्ञेला प्राप्त होतात. पण गुरुकृपाहीन जरी वेदान्ती असला तरी तो केवळ वेषधारी, नामधारीच समजला पाहिजे.
नित्यं ब्रह्म निराकारं, निर्गुणं बोधयेत् परम्। सर्वं ब्रह्म निराभासं, दीपो दीपान्तरं यथा॥१०९॥
एका दिव्याने दुसरा दिवा लावावा तद्वत जो नित्य, निराकार, निर्गुण, निराभास परब्रह्माचा बोध शिष्याला करून देतो तो गुरू होय.
गुरोः कृपाप्रसादेन, आत्मारामं निरीक्षयेत्। अनेन गुरुमार्गेण, स्वात्मज्ञानं प्रवर्तते॥११०॥
गुरुच्या कृपाप्रसादाने आत्मारामाचे निरीक्षण करावे. ह्या गुरुमार्गानेच आपल्या स्वरुपाचे ज्ञान होते. आत्मज्ञान, आत्मबोध आणि आत्मसाक्षात्कारासाठी गुरुचीच कृपा हवी.
आब्रह्मस्तंबपर्यंतं, परमात्मास्वरूपकम्। स्थावरं जंगमं चैव, प्रणमामि जगन्मयम्॥१११॥
ब्रह्मदेवापासून ते तृणवत जीवापर्यंत, परमात्मस्वरूपी स्थावर आणि जंगम, स्थिर आणि अचल चराचररूप जगन्मयाला, जगद्रूप गुरूला मी नमन करतो.
वंदेऽहं सच्चिदानंदं, भेदातीतं सदा गुरुम्। नित्यं पूर्णं निराकारं, निर्गुणं स्वात्मसंस्थितम्॥११२॥
सदा सच्चिदानंदस्वरूप, भेदरहित, नित्य, पूर्ण, निराकार, निर्गुण, स्वात्म्यामध्ये अवस्थित श्रीगुरुला मी नमस्कार करतो.
परात्परतरं ध्येयं, नित्यमानंदकारकम्। ह्रदयाकाशमध्यस्थं, शुद्धस्फटिकसन्निभम्॥११३॥
पराहून पर, ध्यानाचे लक्ष्य, नित्य आनंदकारक, ह्रदयाकाशात मध्यभागी स्थित असलेले, शुद्ध स्फटिकासमान निर्मल असे गुरूचे चिन्मय रूप होय.
स्फटिकप्रतिमारूपं, दृश्यते दर्पणे यथा। तथात्मनि चिदाकार-मानंदं सोऽहमित्युत॥११४॥
जसे दर्पणात (आरशात) शुद्ध स्फटिकाची प्रतिमा दिसते, तद्वतच आत्मप्रकाशात चिदाकार आनंदरूप तो मीच हा सोऽहं भाव प्रकट होतो.
अंगुष्ठमात्रपुरुषं, ध्यायतश्चिन्मयं ह्रदि। तत्र स्फुरती भावो यः, श्रृणु तं कथयाम्यहम्॥११५॥
(ह्याप्रमाणे) अंगठ्याएवढ्या चिन्मय आत्म्याचे ध्यान करता करता जो भाव स्फुरतो तो मी तुला सांगतो, त्याचे श्रवण कर.
अगोचरं तथाऽगम्यं, नामरूपविवर्जितम्। निःशब्दं तद्विजानीयात्, स्वभावं ब्रह्म पार्वती॥११६॥
सूक्ष्म ध्यान जमू लागले की ब्रह्मज्ञान, ब्रह्मस्वरूप साधकाला ज्ञात होते. वास्तविक जे अगोचर, पंचज्ञानेंद्रियांना अवगत न होणारे, जाणता न येणारे, नाम व रूप नसलेले, निशब्दपणाच ज्याचा भाव, मौन हेच ज्याचे स्वरूप; तेच ब्रह्म होय हे साधकाला कळून येते.
यथा गंधः स्वभावेन, कर्पूरकुसुमादिषु। शीतोष्णादिस्वभावेन तथा ब्रह्म च शाश्वतम्॥११७॥
कापूर, फुले ह्यांच्या ठिकाणी स्वभावतःच सुगंध असतो. कापूर उष्ण तर फुले शीतल असतात. स्वभाव नेहमीच शाश्वत असतो. तद्वत् ब्रह्म शाश्वत, चिरकाल होय.
स्वयं तथाविधो भूत्वा, स्थातव्यं यत्रकुत्रचित्। कीटकभ्रमरवत्तत्र, ध्यानं भवति तादृशम्॥११८॥
(ह्याप्रमाणे) ब्रह्मरूप होऊन जगात कोठेही राहावे. कीटक, भुंग्याच्या चिंतनाने जसे त्याचे रूप धारण करतो त्याचप्रमाणे ब्रह्मावर ध्यान करून जीवात्मा ब्रह्मरूप बनतो.
गुरुध्यानं तथा कृत्वा, स्वयं ब्रह्ममयो भवेत्। पिंडे पदे तथा रूपे, मुक्तोऽसौ नात्र संशयः॥११९॥
अंतःकरणात गुरूचे असे ध्यान करता करता साधक ब्रह्ममय बनतो. पिंडी म्हणजे शरीरात, पदांमध्ये, नामादि शब्दात आणि रूपातही (तो ब्रह्मच पाहतो).
गुरुगीताक्षरैकं तु, मंत्रराजमिमं जपेत्। अन्ये च विविधा मंत्राः, कलां नार्हति षोडशीम्॥१३३॥
गुरुगीतेचे एक एक अक्षर परम मंत्र आहे. दुसरे अनेक मंत्र ह्याच्या सोळाव्या भागाचीही बरोबरी करू शकणार नाहीत.
अनंतफलमाप्नोति, गुरुगीताजपेन तू। सर्वपापप्रशमनं, सर्वदारिद्र्यनाशनम्॥१३४॥
श्रीगुरुगीता पठण केल्याने अनंत फलप्राप्ति होते. सर्व पापनाश होतो आणि सर्व प्रकारचे दारिद्र्य नष्ट होते.
कालमृत्युभयहरं, सर्वसंकटनाशनम्। यक्षराक्षसभूतानां, चोरव्याघ्रभयापहम्॥१३५॥
श्रीगुरुगीतेचे सामर्थ्यच असे की श्रीगुरुगीता काळाच्या व मृत्युच्या भयापासून भयप्राप्ती करून देते. सर्व संकटांचा नाश करते. यक्ष, राक्षस, भूत, चोर, व्याघ्रादिपासूनचे भय हरण करते.
महाव्याधिहरं सर्वं, विभूतिसिद्धिदं भवेत्। अथवा मोहनं वश्यं, स्वयमेव जपेत्सदा॥१३६॥
श्रीगुरुगीताजपाने सर्व प्रकारच्या महाव्याधी दूर होतात. सिद्धिदायिनी विभूतीची प्राप्ती होते. सर्व ऎश्वर्यरूपी सिद्धी प्राप्त होतात. तसेच, संमोहन, वशीकरण विद्याही प्राप्त होतात.
-`स्टार वृत्त’ ११०५२०२५