`अनिरुद्ध पहाट-१५’ दासबोध ग्रंथातील सद्गुरुस्तवन!
।। हरि ॐ।।
श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या दासबोध ग्रंथात सद्गुरुस्तवन करण्यात आलेले आहे. सद्गुरुस्तवन करताना श्रीसमर्थ रामदासस्वामी नेमकं काय म्हणतात? आजपासून `अनिरुद्ध पहाट’मध्ये पाहुयात!
आतां सद्गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शों सकेना ।
तें स्वरूप मज अज्ञाना । काये कळे॥ १॥
मला सद्गुरूंचे स्तवन करावे अशी इच्छा तर आहे, पण ज्यांच्यापर्यंत माया पोहोचू शकत नाही, अशा त्या स्वरूपाचे आकलन माझ्यासारख्या अज्ञानी जीवास कसे होणार? म्हणून सद्गुरूचे वर्णन करताच येत नाही, असे म्हणावे लागत आहे.
न कळे न कळे नेति नेति । ऐसें बोलतसे श्रुती ।
तेथें मज मूर्खाची मती । पवाडेल कोठें ॥ २॥
श्रुती ही आत्मविद्येची जननी असून ती सुद्धा ‘नेति नेति’ मला कळत नाही, कळत नाही असे ज्याच्याविषयी म्हणते, त्या स्वरूपाचे वर्णन करण्यास माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धी कशी समर्थ असेल?
मज न कळे हा विचारु । दुर्ह्हूनि माझा नमस्कारु ।
गुरुदेवा पैलपारु। पाववीं मज॥ ३॥
तुमचे वर्णन कसे करावे हेच मला कळत नसल्याने मी तुम्हांला दुरूनच नमस्कार करून प्रार्थना करतो की, हे गुरुदेवा, मला पैलतीरास न्या.
होती स्तवनाची दुराशा । तुटला मायेचा भर्वसा ।
असाल तैसे असा । सद्गुरु स्वामी ॥ ४॥
मायेच्या आधारे तुमचे स्तवन करता येईल अशी अयोग्य आशा मी मनाशी बाळगली होती, पण माया आपणास स्पर्शच करू शकत नसल्याने आता मायेचा आधारही नाहीसा झाला आहे. म्हणून ‘हे सद्गुरू स्वामी, तुम्ही असाल तसे असा’ एवढेच मी म्हणतो.
मायेच्या बळें करीन स्तवन । ऐसें वांछित होतें मन ।
माया जाली लज्यायमान । काय करूं ॥ ५॥
मायेच्या साहाय्याने आपले स्तवन करावे अशी इच्छा माझ्या मनात होती. पण मायाच लाजून बाजूस सरल्यावर मी तरी काय करू?
नातुडे मुख्य परमात्मा । म्हणौनी करावी लागे प्रतिमा ।
तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद्गुुरूचा॥ ६॥
मुख्य परमात्मा इंद्रियगोचर नसल्याने तो हाती गवसत नाही, म्हणून त्याची प्रतिमा करून तिचा आधार घ्यावा लागतो. म्हणून आता त्या मायेचा आधार घेऊनच मी सद्गुरूचा महिमा वर्णन करीन.
आपल्या भावासारिखा मनीं । देव आठवावा ध्यानीं ।
तैसा सद्गुारु हा स्तवनीं । स्तऊं आता ॥ ७॥
आपल्या मनात जसा भाव असेल त्यास अनुसरूनच ध्यानात मनाने आपल्या इष्ट देवाचे स्मरण करावे लागते. तशी माझ्या मनात जशी सद्गुरूची मूर्ती स्थिरावली आहे, तशीच ती आठवून त्या श्रीसद्गुरूचे मी स्तवन करतो.
जय जयाजि सद्गुरुराजा । विश्वंभरा बिश्वबीजा ।
परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधु ॥ ८॥
हे सद्गुरुराजा, तुझा जयजयकार असो ! तूच सर्व विश्वास व्यापले आहेस, तूच विश्वाचे मूळ कारण आहेस व तूच परमपुरुष आहेस; तसेच मोक्ष देणारा व दीनांचा बंधू तूच आहेस.
तुझीयेन अभयंकरें । अनावर माया हे वोसरे ।
जैसें सूर्यप्रकाशें अंधारें । पळोन जाये ॥ ९॥
जसा सूर्यप्रकाशाने अंधार पळून जातो, तशी तुझी कृपा झाली की अनावर अशी मायाही ओसरू लागते.
आदित्यें अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे ।
नीसी जालियां नंतरें । पुन्हां काळोखें ॥ १०॥
सूर्याच्या योगे अंधकार नाहीसा झाला, तरी रात्र झाली की परत काळोखाने ब्रह्मांड भरून जाते.
तैसा नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्य वाव ।
समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ॥ ११॥
पण सद्गुरू स्वामीराज तसे नाहीत. ते अज्ञानाचा समूळ नाश करतात व त्यामुळे परत जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडावे लागत नाही.
-`स्टार वृत्त’ १४०५२०२५