`अनिरुद्ध पहाट-१७’ सद्‌गुरूची कृपा कधीही नाश पावत नाही व शिष्य अमर होतो!

।। हरि ॐ।।

श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या दासबोध ग्रंथात सद्‌गुरुस्तवन करण्यात आलेले आहे. सद्‌गुरुस्तवन करताना श्रीसमर्थ रामदासस्वामी नेमकं काय म्हणतात? ते आपण पाहिल्यास सद्गुरू माहात्म्य समजून येईल. मानवी जीवनात सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही. जीवनाचे अंतिम सत्य आणि परमात्म्याची कार्य करण्याची पद्धत सद्गुरूच मानवाला सांगू शकतात! म्हणूनच श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या दासबोध ग्रंथातील सद्‌गुरुस्तवनाचे स्तवन करायलाच पाहिजे!

आता उपमे द्यावें जळ । तरी तें काळांतरीं आटेल सकळ ।
सद्गुसरुरूप तें निश्चळ । जाणार नाहीं ॥ २३॥

आता जीवनदायी व कोमल म्हणून जलाची उपमा द्यावी, तर कालांतराने पाणीही आटून जाते. शिवाय ते चंचल असते, पण सद्‌गुरु-स्वरूप निश्चल असून त्याचा नाश कधीच होत नाही.

सद्गुरूसी उपमावे अमृत । तरी अमर धरिती मृत्यपंथ ।
सद्गुररुकृपा यथार्थ । अमर करी ॥ २४॥

त्यांना अमृताची उपमा द्यावी तर सदैव अमृतपान करणारे देवही मृत्यूच्या कचाट्यातून सुटत नाहीत. पण एकदा सद्‌गुरूची कृपा झाली की, शिष्य मात्र अमर होतो. म्हणून ही उपमाही देता येत नाही.

सद्गुररूसी म्हणावें कल्पतरु । तरी हा कल्पनेतीत विचारु ।
कल्पवृक्षाचा अंगिकारु । कोण करी ॥ २५॥

सद्‌गुरूला कल्पतरूची उपमाही देता येत नाही. कारण तो जे मागावे तेवढेच व तेही कल्पनेतील पदार्थच देतो. पण सद्‌गुरू कल्पनेच्या पलीकडील मोक्ष देतात. मग कल्पतरूचा अंगीकार कोण करील बरे!

चिंता मात्र नाहीं मनीं । कोण पुसे चिंतामणी ।
कामधेनूचीं दुभणीं । निःकामासी न लगती ॥ २६॥

सदगुरूंना चिंतामणीची उपमाही देता येत नाही. कारण ते शिष्याच्या मनात कुठलीही चिंताच उरू देत नाहीत. त्यांच्या कृपेने शिष्य निष्काम झालेला असतो. मग निष्काम झालेल्या पुरुषास कामधेनूची प्रसन्नता वा पान्हा यांची आवश्यकताच उरत नाही. म्हणून चिंतामणी वा कामधेनू यांच्याही उपमा सद्‌गुरूना देता येत नाहीत.

सद्गुरू म्हणों लक्ष्मीवंत । तरी ते लक्ष्मी नाशिवंत ।
ज्याचे द्वारीं असे तिष्टत । मोक्षलक्ष्मी ॥ २७॥

सद्‌गुरूंना लक्ष्मीवंत म्हणावे, तर तेही योग्य नव्हे कारण लक्ष्मी चंचल असते, नाशिवंत असते, पण सद्‌गुरूंच्या दारी तर साक्षात मोक्षलक्ष्मी त्यांच्या कृपाकटाक्षाची आशा धरून तिष्ठत असते. म्हणून ही उपमाही देता येत नाही.

स्वर्गलोक इंद्र संपती । हे काळांतरीं विटंबती ।
सद्गुतरुकृपेची प्राप्ती । काळांतरीं चळेना ॥ २८॥

स्वर्गलोक, इंद्रपद या सर्व गोष्टी नश्वर असून कालांतराने नाश पावतात. पण सद्‌गुरूची कृपा एकदा झाली की ती कधीही नाश पावत नाही.

हरीहर ब्रह्मादिक । नाश पावती सकळिक ।
सर्वदा अविनाश येक । सद्गुवरुपद ॥ २९॥

ब्रह्मा, विष्णू शिवादी सर्व देव हे कालांतराने नाश पावतात. एक सद्‌गुरुपदच असे आहे की ते अविनाशी आहे.

तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी ।
पंचभूतिक उठाठेवी । न चले तेथें ॥ ३०॥

फार काय सांगावे, ही सर्व सृष्टीच पंचमहाभूतांची असून नाशिवंत आहे. फक्त सद्‌गुरूचे स्वरूपच शाश्वत अविनाशी आहे. तेव्हां त्याची उठाठेव करण्यातही काही अर्थ नाही.

म्हणौनी सद्‌गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना ।
अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१॥

तेव्हा सद्‌गुरूंच्या रूपाचे वर्णन करता येण्यासारखे नाही, हेच माझे वर्णन आहे. जे अंतरीच्या खुणा जाणणारे असतात, त्यांनाच त्यांचे खरे स्वरूप कळते.

सद्गुरुंचे दासबोधामध्ये समर्थ रामदासस्वामींनी केलेले वर्णन आत्मसात केल्यास सद्गुरूंचे माहात्म्य समजून येते. त्यामुळे आपली सद्गुरू भक्ती अधिकाधिक दृढ होत जाते. समर्थ रामदासस्वामींच्या चरणी नतमस्तक व्हायला हवे; कारण सद्गुरूच्या कृपेचा प्रवाह आमच्या जीवनात आणण्यासाठी दासबोधातील सद्गुरू स्तवन त्यांनी प्रकट केले!

-`स्टार वृत्त’ १६०५२०२५

अनिरुद्ध पहाट-१६ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

error: Content is protected !!