`अनिरुद्ध पहाट-९’ सद्गुरु स्वयंप्रकाशी युगपुरुष असतो!
।। हरि ॐ।।
श्रीगुरुगीतेमध्ये सद्गुरुंचे नामस्मरण, सद्गुरुंचे गुणसंकिर्तन, सद्गुरुंची भक्ती का करावी? सद्गुरुंवर पूर्ण श्रद्धा का ठेवावी? हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे सर्व श्रद्धावानांना श्रीगुरुगीतेचे श्रवण अतिशय उपयुक्त असते. म्हणूनच `अनिरुद्ध पहाट’मध्ये श्रीगुरुगीतेचा अर्थ समजून घेत आहोत.
अभ्यस्तैः सकलैः सुदीर्घमनिलैर्व्याधिप्रदैर्दुष्करैः, प्राणायामशतैरनेककरणैर्दुःखात्मकैर्दुर्जयैः।
यस्मिन्नभ्युदिते विनश्यति बलि वायुः स्वयं तत्क्षणात्, प्राप्तुं तत्सहजं स्वभावमनिशं सेवध्वमेकं गुरुम्॥५३॥
हठयोगाचा अभ्यास करून केलेल्या सर्व प्रकारच्या पुष्कळ दीर्घ श्वासोच्छ्वासांनी, ज्यात चुका झाल्या तर शारीरिक व्याधी उद्धवतात; त्याचप्रमाणे कष्टसाध्य शेकडो प्राणायामांनी अनेक इंद्रियांना दुःखदायक, हठयोगालाही असाध्य, ताब्यात न राहणाऱ्या, प्रयासांनी जे मिळवायचे ते; योग्य गुरू प्राप्त झाला तर त्याच क्षणी बलवान वायू स्वतः नष्ट होतो, असे आत्मतत्त्व सहज प्राप्त करून घेण्यासाठी भक्तियुक्त होऊन सतत एका श्रेष्ठ गुरुचीच सेवा करावी.
स्वदेशिकस्यैव शरीरंचिन्तनं, भवेदनन्तस्य शिवस्य चिन्तनम् । स्वदेशिकस्यैव च नामकीर्तनं, भवेदनन्तस्य शिवस्य कीर्तनम् ॥५४॥
स्वरूप दर्शन घडविणाऱ्या गुरूच्या शरीराचे, मूर्तीचे चिंतन म्हणजे अनन्त शिवाचेच ध्यान केल्याप्रमाणे होय. आपल्या गुरूचे नामसंकीर्तन म्हणजेही शिवाचेच स्तवन होय.
यत्पादरेणुकणिका, कापी संसारवारिधे: । सेतुबंधायते नाथं, देशिकं तमुपास्महे ॥५५॥
ज्याच्या चरणधुलीचा एक कण देखील संसारसमुद्र पार करणारा सेतू होतो अशा त्या गुरुनाथाची मी उपासना करतो.
यस्मादनुग्रहं लब्ध्वा, महदज्ञानमुत्सृजेत् । तस्मै श्रीदेशिकेंद्राय, नमश्चाभीष्टसिद्धये ॥५६॥
ज्याचा अनुग्रह प्राप्त झाल्याने महान अज्ञाननाश होतो अशा गुरुदेवांना आपल्या इष्ट विषयसिद्धीसाठी नमस्कार करावा.
पादाब्जं सर्वसंसार-दावानलविनाशकम्। ब्रह्मरंध्रे सिताम्भोजमध्यस्थं चंद्रमण्डले ॥५७॥
अकठादित्रिरेखाब्जे-सहस्त्रदल-मण्डले। हंसपार्श्वत्रिकोणे च, स्मरेत्तन्मध्यगं गुरुम्॥५८॥
ज्याचे चरणकमल सर्व संसारवणव्याला नष्ट करते त्या गुरुदेवांचे, ब्रह्मरंध्रामध्ये मस्तकात ताळूच्या ठिकाणी, चंद्रमंडलांतील श्वेतकमळाच्या मध्यभागी स्थित तसेच अ, क, ठ ह्या वर्णादि तीन रेषांच्या कमळात दोन बाजूंच्या पार्श्वभागी हजार पाकळ्यांनी शोभणाऱ्या, हं सः युक्त असलेल्या, निकटवर्ती त्रिकोणात ध्यान करावे.
सकलभुवनसृष्टीः कल्पिताशेषपुष्टि-र्निखिलनिगमदृष्टिः संपदां व्यर्थदृष्टिः। अवगुणपरिमार्ष्टिस्तत्पदार्थैकदृष्टि-र्भवगुणपरमेष्टिर्मोक्षमार्गैक दृष्टिः॥५९॥
सकलभुवनरंगस्थापनास्तंभयष्टिः, सकरुणरसवृष्टिस्तत्त्वमालासमष्टिः। सकलमयसृष्टिः सच्चिदानंददृष्टि-र्निवसतु मयि नित्यं श्रीगुरोर्दिव्यदृष्टिः॥६०॥
संपूर्ण १४ भुवने उत्पन्न करणारी; इच्छित पदार्थांची निःशेष पुष्टी करणारी; सर्व शास्त्रे, वेद ह्यांचे ज्ञान करून देणारी; लौकिक, ऎहिक ऎश्वर्याचे व्यर्थत्व दाखविणारी; अवगुणांचे परिमार्जन करणारी, तत् पदाकडे, ब्रह्मावर साधकाचे लक्ष एकाग्र करणारी; जगद्रूप दृश्याची परमदृष्टी हवन करणारी (ब्रह्मज्ञानात त्रिगुणात्मक सृष्टीचे, संसाराचे हवन होऊन ब्रह्मज्ञान झाले की अज्ञान जाते, सर्व जगत् गुरुरूप वाटते ); मोक्षमार्गावर साधकाची दृष्टी टिकवून धरणारी; सर्व चौदा भुवनरूपी रंगमंचाच्या स्थापनेला आधारभूत स्तंभ, खांब असलेली; कारुण्याची, स्नेहाची प्रेमरसाची वृष्टी करणारी; तत्त्वज्ञानमालिकांचा समुदाय असलेली; सर्व दर्शने, शास्त्रे ह्यांचे संकेत, आचार ह्यांना निर्माण करणारी; जिच्याने सर्व नीतिनियम, आचारविशेष, कालरचना होतात; सत् चित् आनंदस्वरूपी गुरुकडे साधकाची दृष्टी खेचून खिळविणारी अशी श्रीगुरुची दिव्य दृष्टी नेहमी माझ्यावर राहो. (अशी भक्ताने नित्य प्रार्थना करावी.)
अग्निशुद्धसमंतात, ज्वालापरिचकाधिया। मंत्रराजमिमं मन्येऽहर्निशं पातु मृत्युतः॥६१॥
ज्ञानाग्नीने शुद्ध होऊन चारी बाजूंनी बुद्धीरूपी ज्वालांमध्ये सुवर्णांप्रमाणे तावून सुखावून कसोटीस उतरलेला हा मंत्रराज निरंतर, रात्रंदिवस मृत्यूपासून माझे रक्षण करो.
तदेजति तन्नैजति, तद्दूरे तत्समीपके। तदन्तरस्य सर्वस्य, तदु सर्वस्य बाह्यतः॥६२॥
सच्चिदानंदस्वरूप गुरुतत्त्व गतिशील आहे, अचलही आहे. तो दूर आहे, जवळ पण आहे. सर्वांच्या अंतरी आहे, तसाच बाहेरही आहे. सर्वव्यापी गुरुत्वाचे वर्णन अशाच शैलीने करावे लागते.
अजोऽहमजरोऽहं च, अनादिनिधनः स्वयम्। अविकारश्चिदानन्द, अणीयान्महतो महान्॥६३॥
मी आत्मा जन्मरहित आहे. मला वृद्धत्व नाही. मला स्वतःला आदि अंत नाही. मी विकाररहित आहे. मी ज्ञानमय, आनंदमय आहे. अणूहून लहान आणि मोठ्याहून मोठा आहे.
अपूर्वाणां परं नित्यं, स्वयंजोतिर्निरामयम्। विरजं परमाकाशं, ध्रुवमानन्दमव्ययम्॥६४॥
गुरु हा युगपुरुष असतो. गुरुतत्त्व नित्य, सदैव असते. ते न-असते असे कधी होत नाही. गुरू स्वयंप्रकाशी असतो, परप्रकाशी नसतो. देहमनबुद्धीच्या पलीकडे गुरू गेलेला असतो म्हणून तो शुद्ध असतो. सदा आनंदमय असतो. गुरू तत्त्वाचा कधी नाश होत नाही.
-`स्टार वृत्त’ ०८०५२०२५