दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा!
मुंबई:- समाजात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करणाऱ्या विजयादशमी अर्थात दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, भारतीय संस्कृतीत नवरात्रोत्सवाला महत्त्वाचे स्थान असून शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ होणारा हा उत्सव विश्वव्यापक त्रिगुणात्मक आदिमायेच्या उपासनेचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. त्यासोबतच तो सृजनशक्तीचा सर्वोच्च आविष्कार असलेल्या स्त्रीच्या गौरवाचाही आहे. अध्यात्माच्या पातळीवरील ही भावना व्यावहारिक पातळीवर आणून महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरण आणि सन्मानासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. या पर्वाचा समारोप करणाऱ्या विजयादशमीनिमित्त स्त्री सन्मानासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.