संपादकीय- AI च्या मदतीने प्रगतीचे स्वप्न पाहणाऱ्या सिंधुदुर्गाच्या गंभीर समस्यांचा गतिरोधक हटवा!

AI अर्थात Artificial Intelligence (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता! ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रशासनामध्ये करून सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातच नाही तर देशात आदर्श होण्यासाठी सज्ज झालेला आहे! त्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्ह्याच्या प्रशासनाचे कौतुक करावेच लागेल!

संगणक युगात वेगवेगळ्या शोधातून मानवाला सुखसोयी पुरविण्यासाठी व जीवनातील अडीअडचणी सहजपणे सोडवण्यासाठी अनेक अत्याधुनिक उपक्रम राबविले जातात; ते काळानुसार गरजेचे आणि उपयुक्त असतात. तसा बदल यंत्रणेमध्ये करावाच लागतो. मागील वीस वर्षात अत्याधुनिक Nanotechnology आणि Quantum Physics च्या माध्यमातून मानवी जीवन व्यापून गेले व तंत्रज्ञानाने अगदी कळत नकळत मानवी जीवनामध्ये प्रवेश केला. काळानुसार हे बदल स्वीकारावेच लागतात; त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने बाजी मारली हे समाधानकारक आहे!

मात्र हे समाधान व्यक्त करताना सिंधुदुर्गवासियांच्या ज्या मूलभूत आणि गंभीर समस्या आहेत; त्याकडे लक्ष देणे जरुरीचे नाही का? सिंधुदुर्गामध्ये २४ तास विद्युत पुरवठा सुरू राहण्यासाठी जी यंत्रणा उभी राहणे अपेक्षित होते, ती राहत नाही; हे खेदाने नमूद करावेसे वाटते. `युवकांनी जिल्ह्यात उद्योगधंदे करावेत’ असं राजकारणी नेते आपल्या भाषणात सांगत असतात. पण २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत नसताना उद्योगधंदे, व्यवसाय, कारखाने सुरू कसे राहतील? कुडाळच्या एमआयडीसीची काय अवस्था आहे? जोपर्यंत जिल्ह्यात २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत जिल्ह्यात व्यवसाय करणे शक्य होईल का? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. कोणत्या गावात किती वेळ विद्युत पुरवठा खंडित होतो? का होतो? त्यातून किती नुकसान होते? त्यात सुधारणा कशी करता येईल? हे AI च्या माध्यमातून तपासणे गरजेचे वाटते.

शिक्षणाचा खूप मोठा मुद्दा आहेच! गावातील शाळा बंद पडत आहेत. शिक्षक नसल्याने पालकांना नाविलाजास्तव आपल्या मुलांना तालुक्याच्या किंवा पंचक्रोशीच्या ठिकाणी पाठवावे लागते. पटसंख्येची अट घालून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप शासन करतंय. तर दुसऱ्या बाजूला खाजगी शाळांचे उदंड पीक आले. कष्टकरी गरीब शेतकरी व मोलमजुरी करणारा आपल्या मुलांना शिक्षण देणार कसा? नुकताच शिक्षक आणि संस्था चालकांचा मोर्चा निघाला. त्यांच्या मागण्यांचे काय करणार? AI च्या माध्यमातून ह्याची उत्तरं मिळणार नाहीत. ह्याचेही भान ठेवले पाहिजे.

अनेक वर्षे वैद्यकीय यंत्रणा आयसीयूमध्येच आहे. सिंधुदुर्गातील शासनाच्या रुग्णालयातून बहुतांशी रुग्णांना गोव्यात पाठविले जाते. त्यात आम्ही आजही धन्यता मानतो. त्याच सिंधुदुर्गात खाजगी रुग्णालय दिमाखात उभी आहेत. मात्र तिथे कष्टकरी व मोलमजुरी करणारा जाऊ शकत नाही. कारण लाखो रुपयांचे रुग्णालयांचे बिल तो भरू शकत नाही. याचा अर्थ कष्टकरी गरीब जनतेने तज्ञ डॉक्टर नसलेल्या, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा नसलेल्या शासकीय रुग्णालयातच जावे आणि आपल्या आरोग्याची हेळसांड करावी. त्यात रुग्णांचा जीव जातो. हे भयंकर वास्तव राज्यकर्त्यांना पुरतं ठाऊक आहे. त्यासाठी उपाययोजनांची मलमपट्टी केली जाते. ती नेहमीच अपुरी ठरते. हे लक्षात घ्यायला हवे! इथेही AI ची मदत घेतल्यास राज्यकर्ते किती कमी पडतात? हे सहजपणे लक्षात येईल.

मध्यंतरी विषारी दारूचा प्रश्न माध्यमांमध्ये चर्चिला गेला. अंमली पदार्थ आणि अनधिकृत दारू व्यवसाय याबाबत पोलीस यंत्रणा नेहमीच अपयशी का ठरते? हे गुपित सत्य जिल्हावासियांना माहित आहे. त्यासाठी AI ची गरज नाही. तरीही AI चा वापर करून अंमली पदार्थ आणि अनधिकृत दारू व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर वचक ठेवता येईल. मात्र ह्या गैरधंद्यांमध्ये स्थानिक राजकारणी नेते असल्यास कारवाई करण्याचे धाडस मात्र यंत्रणेला दाखवावे लागेल.

अनधिकृत मायनिंगच्या आणि वाळूच्या व्यवसायातून जिल्ह्यात जे थैमान सुरु आहे; ते रोखण्यासाठी नेमकं काय करता येईल? ह्याची उपाययोजना AI च्या माध्यमातून करता येईल काय? त्यातून होणारी पर्यावरणाची हानी थांबविता येईल काय आणि यंत्रणेचा गैरवापर रोखला जाऊ शकेल काय? ह्याची चाचपणी करायला काय हरकत आहे?

विकासाचे असे अनेक मुद्दे आहेत; यामध्ये AI च्या वापर करून जिल्हावासियांना दिलासा देता येऊ शकतो. प्रशासनावर वचक ठेवता येऊ शकतो. प्रशासन गतिमान होऊ शकते; तेव्हाच AI चे कौतुक खऱ्या अर्थाने करता येईल. AI च्या मदतीने प्रगतीचे स्वप्न पाहणाऱ्या सिंधुदुर्गाच्या गंभीर समस्यांचा गतिरोधक हटविण्याची गरज आहे. प्रशासन जोपर्यंत लोकाभिमुख होत नाही तोपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान हे कुचकामी ठरते. हे लक्षात ठेवूनच प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी योजना आखायला हव्यात. आधुनिक तंत्रज्ञानाचा ढोल वाजून मूलभूत समस्यांचे निराकारण होणार नाही!

-नरेंद्र हडकर

हेही वाचा!

संपादकीय- सिंधुदुर्गातील आकांच्या आकांचे बाप कोण?