संपादकीय- सिंधुदुर्गातील आकांच्या आकांचे बाप कोण?
छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण येथील समुद्रात कुरटे बेटावर स्वराज्याच्या संरक्षणासाठी सिंधुदुर्ग उभारला! स्वराज्याची खरीखुरी प्रतिमा नव्हे तर साक्षात स्वराज्याचा मजबूत साक्षीदार म्हणून आजही सिंधुदुर्ग अरबी समुद्राच्या लाटा अंगावर घेत, सुसाट्याचा वारा झेलत समर्थपणे उभा आहे! रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन जो तळकोकणातला जिल्हा तयार झाला त्याला `सिंधुदुर्ग’ हे नाव दिले गेले!
ह्या सिंधुदुर्गची प्रतिमा बॅ. नाथ पै, मधू दंडवते अशा राजकारण्यांनी अधिक उजळ केली. त्याच सिंधुदुर्गात आजपर्यंत राजकीय खूनखराबा झाला तो लांच्छनास्पद आहे! ह्या घटना फक्त सिंधुदुर्गातच झाल्या का? बीडमध्ये संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली; त्यामुळे बीड बदनाम झाला का? नाही! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आका जन्माला आले. त्यांना जन्माला घालणारे आकांचे आका आणि आकांच्या आकांचे बाप हे राजकारणी किंवा राजकारणी व्यक्तींच्या निकटचे असतात; हे अनेक खुनांच्या गुन्ह्यात उघड झालंय; अनेक खुनांच्या गुन्ह्यांचे तपास दबावापोटी दबले जातात; तर काही खुनांचे गुन्हे दाखलही होत नाहीत! हे सत्य आहे!
बीड येथील संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी माणसाच्या माणुसकीलाच आव्हान दिले आणि हत्येचे व्हिडीओ रेकॉर्डिंग आपल्या आकांना दाखविले. ते जगासमोर आले. अशा घटना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात घडत असतात; फक्त त्याचं प्रमाण कमी जास्त असू शकेल; एवढंच! त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्त्येमुळे बीड बदनाम झाले किंवा प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणात सिंधुदुर्गाची बदनामी होईल; असे कोणी म्हणत असेल तर ते राजकीय वक्तव्य असेल; ज्यास काडीचीही किंमत नाही. कारण आकांच्या आकांना जन्माला घालणारे बाप राजकीय पुढारी असतात किंवा राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित असतात; हे लक्षात घ्यायला हवे! पूर्वी गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांशी राजकारणी चार हात लांब राहायचे; पण आता गुन्हेगारी कृत्यांना प्रतिष्ठा मिळण्यासाठी राजकीय पक्षांचा आश्रय घेतला जातो; जेणेकरून चुकीचे, बेकायदेशीर, माणुसकीला काळिमा फासणारी कृत्य करणारी राक्षसी प्रवृत्ती राजकारणाच्या माध्यमातून पावन होते- पवित्र होते!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरण उजेडात आले; त्याचे मूळ कशामध्ये आहे? तर गोवा बनावटीची दारू अनधिकृतपणे ने- आण करणे आणि जिल्ह्यात विकणे व करोडो रुपयांची उलाढाल करणे; यात आहे. गेली पंधरा-वीस वर्षे सिंधुदुर्गात गोवा बनावटीची दारू अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात विकली जाते; त्याला निर्बंध घालण्यात पोलिसांना अपयश आले याची कारणं काय? ह्यावर चर्चा का होत नाही?
गोवा बनावटीची दारू अनधिकृतपणे विकण्याच्या कारभारात जी मंडळी असते, ती राजकीय पक्षांशी संबंधित असते. त्यामुळे राजकीय दबाव पोलिसांवर असतो. अनधिकृतपणे दारू व्यवसाय करणाऱ्याच्या विरोधात जरी पोलीसी कारवाई झाली तरी ते कमकुवत कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत सुटतात. अनधिकृतपणे दारू व्यावसायिक राजकीय पुढारी व पोलीस यंत्रणेशी साटलोटं करून अर्थपूर्ण तडजोड करण्याचा मार्ग स्वीकारतात. त्याविरोधात सर्वसामान्य माणूस तक्रार करू शकत नाही. हे वास्तव आहे. दारूच्या चोरट्या व्यवसायात अगदी गावागावातील तथाकथित पुढारी सामील असतात. पोलिसांची व राज्य उत्पादन शुल्क खात्याची धाड पडते तेव्हा फक्त नामधारी माणसावर केसेस दाखल केल्या जातात व मालक नामानिराळा राहतो. ही राक्षसी यंत्रणा सिंधुदुर्गात अस्तित्वात नाही, असं कोण म्हणू शकेल?
कुठल्या गावात, कुठल्या चौकात अनधिकृत दारूचा व्यवसाय सुरू आहे; हे पोलिसांना माहीत नाही; असं म्हणणंही मूर्खपणाचं ठरेल. गैरधंदे कोण करतो? कसं करतो? हे सगळं पोलिसांना, शासकीय यंत्रणांना, राजकारण्यांना माहीत असतं; पण त्यावर कारवाई होत नाही. समझोता करून किंवा कानाडोळा करून प्रत्येकजण आपापली पोळी भाजून घेतो. आज बहुतांशी गावात गैरधंदे (दारू, मटका, जुगार, अंमली पदार्थ, जमिनीचे अनधिकृत व्यवहार, अनधिकृत मायनिंग आणि कमिशन ठेकेदारी) करणारे गावाचे मुखिया बनतात. त्यांच्या विरुद्ध `ब्र’ काढण्याची कोणाची हिम्मत होत नाही. कारण राक्षसी यंत्रणा कधीही सर्वसामान्यांची बाजू घेणारी नसते.
प्रकाश बिडवलकर यांच्या नावे अनधिकृत दारूची वाहतूक करणे व विकणे ह्यासंदर्भात अनेक गुन्हे दाखल आहेत. ह्याचा अर्थ त्याचा मालक अर्थात आका कोणीतरी होता! त्या आकाचा आका आणि आकाच्या आकाचा बाप कोणीतरी आहे; हे निश्चित! त्याच्यापर्यंत पोहोचणं अवघड आहे; पण दोन वर्षांनी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यावर निवती पोलिस ठाण्याने कौतुकास्पद कामगिरी करून आरोपी ताब्यात घेतले; तेव्हा ते सत्य बाहेर आले! ते सिंधुदुर्गाची पुन्हा एकदा बदनामी करणार होतं! अशा प्रत्येक घटनेमध्ये राजकीय पक्षांचे पुढारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारच! हा राजकारणाचा एक भाग असतो. बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक हत्त्या उघडकीस आल्या! विशेष म्हणजे आरोप प्रत्यारोप करणारे राजकीय पुढार्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली! म्हणूनच सिंधुदुर्गात खुनांबाबत राजकीय पुढाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप एकमेकांचे बुरखे फाडणारे असतील! त्यातूनच `खरे’ चेहरे सिंधुदुर्गवासियांना पाहायला मिळतील!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधू भूमीत खून खराबा करणाऱ्या, सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या राक्षसी यंत्रणेविरोधात आता जनतेने उभे राहिले पाहिजे. तरच आम्हाला सिंधुदुर्गाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मिरवता येईल!