`अनिरुद्ध पहाट-१०’ मानवी जीवनात सद्गुरुंशिवाय तरणोपायच नाही!

।। हरि ॐ।।

होय! हे अगदी खरं आहे. मानवी जीवनात सद्गुरुंशिवाय तरणोपायच नाही! असं का म्हटलं गेलंय? ह्याचं उत्तर मिळविण्यासाठी आम्हाला गुरुगीतेचं पठण करता आलं पाहिजे. साक्षात भोलेनाथ महादेवाने सद्गुरु तत्वाबाबत जे काही वर्णन केले आहे ते गुरुगीतेत आहे. गुरुगीतेचं पठण-श्रवण सुद्धा मानवाला सद्गुरु तत्वाला सदैव जोडून ठेवण्याचे कार्य करेल. सद्गुरु भक्ती अधिकाधिक संपन्न होत जाईल.

श्रुतिः प्रत्यक्षमैतिह्यमनुमानश्चतुष्टयम्। यत्स चात्मतपो वेद, देशिकं च सदा स्मरन्॥६५॥
मननं यद्भवं कार्यं, तद्वदामि महामते। साधुत्वं च मया दृष्टा, त्वयि तिष्ठति सांप्रतम्॥६६॥

ज्या गुरुदेवाचे आत्मतपोबल वेदशास्त्र, प्रत्यक्ष प्रमाण, इतिहास आणि अनुमान ह्या चार मार्गांनी जाणले जात असते; अशा गुरूचे स्मरण करून हे महामते माझ्यासमोर बसलेल्या तुझ्यातील साधुत्व बघून ज्या विषयावर मनन केले गेले पाहिजे तो विषय मी सांगतो.

अखण्डमण्डलाकारं, व्याप्तं येन चराचरम्। तत्पदं दर्शितं येन, तस्मै श्रीगुरवे नमः॥६७॥

ज्याने हे चर-अचर, खंडित न होणारे वलयाकार मंडळ व्यापले आहे, असे ब्रह्मपद दाखविणाऱ्या श्रीगुरुला नमस्कार असो.

सर्वश्रुतिशिरोरत्न-विराजितपदांबुजमः। वेदान्ताम्बुजसूर्यो यस्तस्मै श्रीगुरवे नमः॥६८॥

ज्याचे चरणकमल सर्व वेदांच्या मुकुटमणीरूप महावाक्यांनी सुशोभित आहे, जो वेदांतरूपी कमळाला विकसित करणारा जणू सूर्यच आहे, अशा श्रीगुरुला नमस्कार असो.

यस्य स्मरणमात्रेण, ज्ञानमुत्पद्यते स्वयम् । य एव सर्वसम्प्राप्तिस्तस्मै श्रीगुरवे नमः॥६९॥

ज्याचे केवळ स्मरण केले असता आपोआप ज्ञान उत्पन्न होते, जो स्वतःच सर्व प्राप्तिरूप आहे, त्या श्रीगुरुला नमस्कार असो.

चैतन्यं शाश्वतं शान्तं, व्योमातीतं निरंजनम्। नादबिंदुकलातीतं, तस्मै श्रीगुरवे नमः॥७०॥

जो चैतन्यस्वरूप, शाश्वत, शांत, आकाशादिपेक्षा सूक्ष्म, निरंजन, नादातीत, बिंदुतीत, कलातीत आहे अशा श्रीगुरुला नमस्कार असो.

स्थावरं जंगमं चैव, तथा चैव चराचरम्। व्याप्तं येन जतत्सर्वं, तस्मै श्रीगुरवे नमः॥७१॥

पर्वतादि स्थावर आणि पशुपक्षीमानवादि स्थलांतर करणारे, तसेच चर आणि अचर, सजीव-निर्जीव असे सर्व जग ज्याने व्यापले आहे, त्या श्रीगुरुला नमस्कार असो.

ज्ञानशक्तीसमारूढस्तत्त्वमालाविभूषितः। भुक्तिमुक्तिप्रदातायस्, तस्मै श्रीगुरवे नमः॥७२॥

आत्मज्ञानाच्या शक्तीवर आरूढ झालेला, तत्त्वज्ञानसमुदायाने अलंकृत असलेला, भुक्ति व मुक्ति, भोग व मोक्ष देणाऱ्या श्रीगुरुला नमस्कार.

अनेकजन्मसंप्राप्त-सर्वकर्मविदाहिने। स्वात्मज्ञानप्रभावेण, तस्मै श्रीगुरवे नमः॥७३॥

आपल्या आत्मज्ञानाच्या प्रभावाने, जन्मोजन्मी साठविलेल्या सर्व संचित कर्माचे भस्म करणाऱ्या श्रीगुरुला नमस्कार असो.

न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः। तत्त्वं ज्ञानात्परं नास्ति, तस्मै श्रीगुरवे नमः॥७४॥

गुरुतत्त्व सर्वश्रेष्ठ होय, गुरुहून वरचढ दुसरे काही नाही. गुरुसेवा आणि गुरुभक्तीहून श्रेष्ठ असे दुसरे तप नाही. तत्त्वज्ञानापेक्षा दुसरे कोणतेही ज्ञान श्रेष्ठ नाही. अशा श्रेष्ठ गुरूला नमस्कार असो.

मन्नाथः श्रीजगन्नाथो, मद्‌गुरुस्त्रिजगद्‌गुरुः। ममात्मा सर्वभूतात्मा, तस्मै श्रीगुरवे नमः॥७५॥

माझे गुरुनाथ सर्व जगाचेच नाथ, स्वामी, मालक आहेत. माझे गुरू तिन्ही जगाचे गुरू आहेत. माझा आत्मा सर्वव्यापी म्हणजेच सर्वांभूती असणारा आत्मा आहे. अशा प्रकारचा अनुभव आणून देणाऱ्या श्रीगुरुला नमस्कार असो.

ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः, पूजामूलं गुरोः पदम् । मंत्रमूलं गुरोर्वाक्यं, मोक्षमूलं गुरोः कृपा॥७६॥

ध्यानाचे आधारस्थान गुरुमूर्ती होय. पूजेचे मूलस्थान गुरुचरण, मंत्राचे उगमस्थान गुरुवाक्य, मोक्षाचा मूलाधार गुरूची कृपा होय.

गुरुरादिरनादिश्च, गुरुः परमदैवतम्। गुरोः परतरं नास्ति, तस्मै श्रीगुरवे नमः॥७७॥

गुरु आदि, प्रथमपासून आहे, सर्वांचे मूळ उगमस्थान आहे. पण गुरूला स्वतःला दुसरे उगमस्थान नाही. गुरुतत्त्व स्वयंभू आहे. गुरुच परम दैवत. गुरुहून दुसरे श्रेष्ठ काही नाही. अशा श्रीगुरुला नमस्कार असो.

सप्तसागरपर्यन्त – तीर्थस्नानादिकं फलम्। गुरोरंघ्रिपयोबिंदुसहस्त्रांशे न दुर्लभम्॥७८॥

सातही सागरापर्यंतच्या तीर्थस्थानादिकांचे फल एका गुरुचरणतीर्थाच्या बिंदूच्या हजाराव्या भागाच्या अंशातही दुर्लभ नाही. गुरूच्या चरणतीर्थात सात समुद्रात स्नान केल्याचे फळ मिळते, इतकें गुरुचरणतीर्थ श्रेष्ठ आहे.

हरौ रुष्टे गुरुस्त्राता, गुरौ रुष्टे न कश्चन। तस्मात्सर्वप्रयत्नेन, श्रीगुरुं शरणं व्रजेत्॥७९॥

हरीचा कोप झाला तर गुरू भक्ताचे रक्षण करतो. पण गुरुच रुष्ट झाला तर भक्ताला कोणी त्राता नाही. म्हणून सर्व प्रयत्नांनी गुरूला शरण जावे.

गुरुरेव जगत्सर्वं, ब्रह्मविष्णुशिवात्मकम् । गुरोः परतरं नास्ति, तस्मात्‌संपूजयेद् गुरुम् ॥८०॥

श्रीगुरुच सर्व जगत् होय. ब्रह्माविष्णुशिवस्वरूप गुरू होय. गुरूहून श्रेष्ठ दुसरा कोणी नाही, दुसरे काही नाही. म्हणून गुरूची उत्तम प्रकारे मनःपूर्वक पूजा करावी. सम-पूजा करावी म्हणजे सर्वत्र सर्वांच्यात गुरूचा अंश ओळखून सर्वांचा सारखा मान ठेवावा.

-`स्टार वृत्त’ ०९०५२०२५

अनिरुद्ध पहाट-९ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!