`अनिरुद्ध पहाट-१३’ श्रीगुरुगीता पठणाने जीवनाच्या कल्याणासह जन्मोजन्मीचं भलं होतं!

।। हरि ॐ।।

श्रीगुरुगीता पठणचे माहात्म्य प्रत्येक श्रद्धावानाने समजून घेतलेच पाहिजे. अशक्य ते शक्य करतील स्वामी! हे आपण सहजपणे म्हणतो आणि त्याची आपणास प्रचितीही येते. त्याचप्रमाणे श्रीगुरुगीता पठणही अशक्य ते शक्य करते. अपयश जाऊन यश येते, नवग्रहांची पीडा दूर होते. सर्वप्रकारच्या बाधा, पाप आणि कोप नाश पावतात. श्रीगुरुगीता सर्वांचेच मंगल करते. अमंगलाला शुद्ध करून त्याचे कल्याण साधते. सर्व प्रश्न मिटवते. सर्व गरज भागवते.

सर्वेषां स्तंभनकरं, गुणानां च विवर्धनम्। दुष्कर्मनाशनं चैव, सुकर्मसिद्धिदं भवेत् ॥१४४॥

सर्वांना मंत्रमुग्ध करणारे, स्तंभित बनविणारे, गुणवर्धक, दुष्कर्मनाशक, सुकर्मफलदायी असे हे श्रीगुरुगीतापठण होय.

असिद्धं साधयेत्कार्यं, नवग्रहभयापहम् । दुःस्वप्ननाशनंचैव, सुस्वप्नफलदायकम् ॥१४५॥

श्रीगुरुगीता जपणाऱ्याचे अपूर्ण कार्य पूर्ण होते. असिद्ध सिद्ध होतो, अपयश जाऊन यश येते, नवग्रहांची पीडा दूर होते, वाईट स्वप्नांचा नाश होतो. चांगली स्वप्ने सत्य, खरी ठरतात.

सर्वबाधाप्रशमनं, धर्मार्थकाममोक्षदम् । यं यं चिंतयते कामं, तं तं प्राप्नोति निश्चितम् ॥१४९॥

श्रीगुरुगीता जपल्याने सर्व बाधांची शांती होते. पीडा पीडित नाहीत. काहीही बाधत नाहीत. जीवन सर्वांगपरिपूर्ण होते. जो जे वांच्छिल ते लाभते. 

कामितस्य कामधेनुः, कल्पनाकल्पपादपः । चिंतामणिश्चिंतितस्य, सर्वमंगलकारकम् ॥१५०॥

सकाम भक्ती करणाऱ्यांची श्रीगुरुगीता सर्व इच्छापूर्ती करणारी कामधेनु होय. कल्पना (कामना) करणाऱ्यांसाठी संकल्प (कामना) तडीस नेणारा कल्पवृक्ष म्हणजे श्रीगुरुगीता होय. मन व बुद्धीप्रमाणे चित्ताचेही सुखसमाधान, शांती श्रीगुरुगीतापठणाने होते म्हणून श्रीगुरुगीता चिंतामणी पण होय. श्रीगुरुगीता सर्वांचेच मंगल करते. अमंगलाला शुद्ध करून त्याचे कल्याण साधते. सर्व प्रश्न मिटवते. सर्व गरज भागवते.

मोक्षहेतुर्जपन्नित्यं, मोक्षश्रियमवाप्नुयात् ॥ भोगकामो जपेद्यो वै, तस्य कामफलप्रदम् ॥१५१॥

मोक्षप्राप्तीचे ध्येय ठेवणाऱ्या मुमुक्षूने श्रीगुरुगीता नित्य जपली तर त्याला मुक्ती नक्की लाभेल. त्याचबरोबर केवळ भोगप्राप्तीचीच इच्छा धरून श्रीगुरुगीता वाचणाऱ्यालाही सर्व इंद्रियभोगसुख लाभेल.

जपेच्छाक्तश्च सौरश्च, गाणपत्यश्च वैष्णवः। शैवश्च सिद्धिदं देवि, सत्यं सत्यं न संशयः॥१५२॥

हे देवी, शक्तीचे उपासक, सूर्योपासक, गणपति, विष्णु, शिव आदि सर्व भिन्न भिन्न देवदेवतांचे उपासक असतील तरी त्यांनाही श्रीगुरुगीता सिद्धिप्रद होते; ह्यात मुळीच संशय नाही.

गुरुपुत्रो वरं मूर्खस्तस्य सिध्द्यन्ति नान्यथा। शुभकर्माणि सर्वाणि, दीक्षाव्रततपांसि च॥१५७॥

सर्व शुभ कर्मे, दीक्षा, व्रत, जप ही सफल कोणाला होतात तर केवळ गुरुपुत्रालाच होय. मग लौकिक दृष्ट्या तो मूर्ख असला तरीही.

संसारमलनाशार्थं, भवपाशनिवृत्तये। गुरुगीतांभसि स्नानं, तत्त्वज्ञः कुरुते सदा॥१५८॥

संसारमलनाशार्थ, भवबन्धमुक्त होण्यासाठी गुरुतत्त्वज्ञानी श्रीगुरुगीतारूपी जलात सदैव स्नान करतो.

स एव च गुरुः साक्षात्, सदा सद्‌ब्रह्मवित्तमः। तस्य स्थानानि सर्वाणि, पवित्राणि न संशयः॥१५९॥

सद् ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये जो श्रेष्ठ आहे तोच साक्षात गुरू होय. गुरू ज्या ठिकाणी निवास करतो ती सर्व स्थाने पवित्र होत ह्यात संशय नाही.

सर्वशुद्धः पवित्रोऽसौ, स्वभावाद्यत्र तिष्ठति। तत्र देवगणाः सर्वे, क्षेत्रे पीठे वसन्ति ही॥१६०॥

सर्वशुद्ध व पवित्र असा गुरू सहजरीत्या जेथे वास्तव्य करतो त्या क्षेत्री, त्या पिठात सर्व देवतांचा समुदाय निवास करतो.

एवंविधो महामुक्तः, सर्वदा वर्तते बुधः। तस्य सर्वप्रयत्नेन, भावभक्तिं करोति यः॥१६५॥
सर्वसंदेहरहितो, मुक्तो भवति पार्वती। भुक्तिमुक्तिद्वयं तस्य, जिव्ह्राग्रे च सरस्वती॥१६६॥

गुरु सदाच मुक्त असतो. अशा गुरूची जो सर्वप्रयत्नपूर्वक भावपूर्ण होऊन भक्ती करतो तो देखील निःसंशय मुक्त होतो. गुरुभक्ताला भुक्ति व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. गुरुभक्ताच्या जिभेच्या टोकावर प्रत्यक्ष सरस्वती वास करते.

अनेन प्राणिनः सर्वे, गुरुगीताजपेन तू। सर्वसिद्धिं प्राप्नुवन्ति, भुक्तिं मुक्तिं न संशयः॥१६७॥

श्रीगुरुगीता जपाने सर्व प्राणी सर्व सिद्धींची, भोग व मोक्ष दोन्हींची प्राप्ती करतात ह्यात मुळीच शंका नको.

सत्यं सत्यं पुनः सत्यं, धर्मं सांख्यं मयोदितम्। गुरुगीतासमं नास्ति, सत्यं सत्यं वरानने॥१६८॥

हे सुमुखी, मी वर सांगितलेले धर्मयुक्तज्ञान सत्य आहे, पूर्ण सत्य आहे. श्रीगुरुगीते समान खरोखर अन्य काहीही नाही.

एको देव एकधर्म, एकनिष्ठा परंतपः। गुरोः परतरं नान्यन्नास्ति तत्त्वं गुरोः परम्॥१६९॥

गुरुच एक देव होय. गुरुच एक धर्म होय. गुरुच एक निष्ठा, एकच श्रेष्ठ तपही होय. गुरुहून श्रेष्ठ काही नाही. गुरुपुढे महान कोठलेही तत्त्व नाही.

माता धन्या पिता धन्यो, धन्यो वंशः कुलं तथा। धन्या च वसुधा देवि, गुरुभक्तिः सुदुर्लभा॥१७०॥

हे देवी, गुरुभक्ताचे माता-पिता, कुळ, वंश धन्य होय. तसेच पृथ्वी देखील गुरुभक्तांमुळे धन्यता पावते.

शरीरमिंद्रियं प्राणश्चार्थः स्वजनबांधवाः। माता पिता कुलं देवि, गुरुरेव न संशयः॥१७१॥

हे देवी, शरीर, इंद्रिये, प्राण, स्वजनबांधव, माता, पिता, कूळ इ. सर्व गुरुमध्ये सामावून आहेत, ह्यात संशय नाही.

आकल्प जन्मना कोट्या, जपव्रततपःक्रियाः। तत्सर्वं सफलं देवि, गुरुसंतोषमात्रतः॥१७२॥

हे देवी, कल्पांतापर्यंत म्हणजे कोटी कोटी जन्मांचे जप, व्रत, तप इ. सर्व क्रिया एक मात्र गुरूला संतोषित, प्रसन्न केल्यानेच सफल होऊ शकतात. दुसऱ्या कशाने नाही.

विद्यातपोबलेनैव, मंदभाग्याश्च ये नराः। गुरुसेवां न कुर्वन्ति, सत्यं सत्यं वरानने॥१७३॥

विद्या, तप, बल ह्यांच्या गर्वाने गर्विष्ठ झालेले जे गुरुसेवा करित नाहीत ते हे सुंदरी, खरोखरच मोठे मंदभाग्याचे होत.

ब्रह्माविष्णुमहेशाश्च, देवर्षिपितृकिन्नराः। सिद्धचारणयक्षाश्च, अन्येऽपि मुनयो जनाः॥१७४॥

ब्रह्मा, विष्णु, महेश, देवर्षि, पितर, किन्नर, सिद्ध, चारण, यक्ष, तसेच दुसरे मुनिजन ह्यांना देखील केवळ गुरुभक्तिने आपापले पद प्राप्त झाले आहे.

गुरुभावः परं तीथमन्यतीथं निरर्थकम्। सर्वतीर्थाश्रयं देवि, पादांगुष्ठं च वर्तते॥१७५॥

गुरुभाव हेच श्रेष्ठ तीर्थ होय. अन्य तीर्थे निरर्थकच होय. हे देवी, सर्व तीर्थांचा आधार गुरुचरणाचा अंगठा होय.

जपेन जयमाप्नोति, चानंतफलमाप्नुयात्। हीनकर्म त्यजन्सर्वं, स्थानानि चाधमानि च॥१७६॥

श्रीगुरुगीतेचा जप केल्याने माणूस विजयी होतो आणि अनंत फलप्राप्ति करून घेतो. हीन, त्याज्य कर्मे त्यागून; अधम, अपवित्र स्थाने वर्ज्य करून – टाळून श्रीगुरुगीताजप करावा.

श्रीगुरुगीता पठण केल्याने जीवनाचं कल्याण होतंच; शिवाय जन्मोजन्मीचं भलं होतं. `अनिरुद्ध पहाट’मध्ये श्रीगुरुगीतेचं माहात्म्य जे आहे ते प्रत्येकाच्या जीवनात सफल होवो; ही सद्गुरू चरणी प्रार्थना! `अनिरुद्ध पहाट’मध्ये श्रीगुरुगीता सफल संपूर्ण होत आहे!

-`स्टार वृत्त’ १२०५२०२५

 

अनिरुद्ध पहाट-१२ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

error: Content is protected !!