`अनिरुद्ध पहाट-१९’ एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।।
।। हरि ॐ ।।
तूं मजकडे अनन्य पाहीं।
पाहिन तुजकडे तैसाच मीही।
माझ्या गुरूनें अन्य कांहीं।
शिकविलें नाहींच मजलागीं।।
भावार्थ- तू माझ्याकडे अनन्यपणे म्हणजे एकनिष्ठपणे बघ. म्हणजे मी सुद्धा तुझ्याकडे तसाच पाहीन. याशिवाय दुसरे काही माझ्या गुरुने मला शिकविलेले नाही.
सद्गुरुंच्या प्रतिमेकडे बघा, मुर्तीकडे बघा किंवा प्रत्यक्ष त्याच्याकडे बघा; पण प्रेमाने बघा, भावाने बघा, विश्वासाने बघा, मनापासून बघा. त्याच्याकडे पूर्ण श्रद्धेने-निष्ठेने
तो एकच माझा तारणहार,
तो एकच माझा कर्ता करविता,
तो एकच माझा सर्वस्वी;
ह्या भावाने भक्त जेव्हा त्याच्याकडे बघतो, त्याच्या नयनांकडे बघतो; तेव्हा तो सद्गुरु परमात्माही आपल्या भक्तांकडे बघतो.
सद्गुरुंनी बघितल्यावर आमचं दुष्प्रारब्ध कितीही मोठं असो, आमच्या समोर कुठलंही संकट असो, आमचा कुठलाही प्रॉब्लेम असो; त्याची उकल होतेच. आमच्या ह्या जन्मासह मागील सर्व जन्मातल्या पापांना जाळून नष्ट केलं जातं, आमच्या अंगावर कोसळणारा डोंगर जागच्या जागी थांबविला जातो, आमच्या मनातील नास्तिकता नाहीशी केली जाते, आमच्या मनात-बुद्धीत पवित्र विचार स्थिर केले जातात. त्यासाठी सद्गुरुंना आम्ही बघायला शिकलं पाहिजे आणि ह्याचं प्रशिक्षणही तोच देतो. म्हणूनच साईनाथ म्हणतात,
नलगे साधनसंपन्नता।
नलगे षट्शास्त्रचातुर्यता।
एक विश्वास असावा पुरता।
कर्ता हर्ता गुरु ऐसा।।७४।।
त्या सद्गुरुंचं प्रेम मिळविण्यासाठी सद्गुरु श्रीसाईनाथ आम्हाला अत्यंत सोपा, पवित्र, सुदंर मार्ग सांगतात.
ज्ञानप्राप्तीची चार साधने आहेत. विवेक, वैराग्य, शमादी षड्संपत्ती आणि मुमुक्षता. ही साधनं असल्यावर साधन संपन्नता येते. परंतु सद्गुरुंचं प्रेम मिळविण्यासाठी साधन संपन्नतेची आवश्यकता नाही.
न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा अर्थात वेदोक्त. सद्गुरुंचं प्रेम मिळविण्यासाठी ह्या सहा शास्त्रांमध्येही निपुणता असण्याचीही गरज नाही. मग भक्ताकडे काय असायला हवे? सद्गुरुंची कृपा जीवनात येण्यासाठी, सद्गुरु आमच्या जीवानाचा सुत्रधार होण्यासाठी, सद्गुरु माऊलीचं प्रेम मिळविण्यासाठी संपूर्ण सद्गुरुच आपलासा होण्यासाठी भक्तांचा भाव कसा असायला पाहिजे?
एक विश्वास असावा पुरता।
कर्ता हर्ता गुरु ऐसा।।
‘त्या’ एकाचवर पूर्ण विश्वास असायला पाहिजे की, तोच आमचा कर्ता आहे. आमच्यातील पापांचा दुष्प्राब्धाचा नाश करणारा तोच आहे. आमच्या मनातील शत्रू असो वा बाहेरचे शत्रू असो; त्यांचा नाश करणारा तो एकच आहे. हा एक विश्वासच यापुढे येणाऱ्या काळासाठी आम्हाला सामर्थ्य पुरविणार आहे. म्हणूनच आमच्या सद्गुरु माऊलीने– सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी
एक विश्वास असावा पुरता।
कर्ता हर्ता गुरु ऐसा।।
हे पद आम्हा प्रत्येकाला जीवनात दृढ करायला सांगितलं होतं व दृढ करण्यासाठी लागणारी ताकदही सद्गुरु श्री अनिरुद्धांनी पुरविली. चुकतमाकत, अडखळत-पडत, चाचपडत आम्ही प्रयास केला आणि खूप काही मिळाले. जे अनंत काळासाठी आमची सोबत करणार आहे. यापुढेही मिळत राहणारआहे. जे मिळाले ते शब्दात मांडणे कठीण. पण मिळाल्याचे ‘भाव’ प्रकट करणं सोपं आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच सद्गुरु श्री अनिरुद्ध बाप्पाच्या चरणी समर्पित!
-`स्टार वृत्त’ १८०५२०२५