राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मिळणार लाभ

मुंबई,दि. १९:- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर राज्यात २५ लाख ५ हजार ३०० अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना तर ५ कोटी ९२ लाख १६ हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थींना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक हक्क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यासाठी ७६.३२ टक्के ग्रामीण (४६९.७१ लक्ष) व ४५.३४ टक्के शहरी (२३०.४५ लक्ष) असे एकूण ७ कोटी लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे.

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वरील माहितीच्या आधारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर सध्या राज्यात अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांची संख्या नाशिक, जळगाव, नंदूरबार, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सात जिल्ह्यात सर्वाधिक आहे. नाशिक जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक १ लाख ७८ हजार ५६३, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या २९ लाख ८० हजार ८०४, जळगांव जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक १ लाख ३५ हजार १९२, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या २२ लाख १९ हजार ६९०, नंदूरबार जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक १ लाख ६ हजार ८५७, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यी संख्या ७ लाख ४१ हजार ३६०, अमरावती जिल्ह्यातील अत्योंदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक १ लाख २५ हजार ६३२, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या १४ लाख ८ हजार ८७८, यवतमाळ जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक १ लाख ३२ हजार ६०३, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या १४ लाख ६९ हजार १३६, चंद्रपूर जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक १ लाख ४० हजार ६२१, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या १० लाख ७४ हजार २४०, गडचिरोली जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक १ लाख ०२ हजार ३३८, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या ४ लाख ५७ हजार ८६९ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. राज्यात एकूण २५ लाख ५ हजार ३०० अंत्योदय शिधापत्रिकाधारक, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी संख्या ५ कोटी ९२ लाख १६ हजार यांना सवलतीच्या दरात योग्य व गरजू व्यक्तींना अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्यांचा सुधारित इष्टांक देण्याच्या दृष्टीने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वर (Digitisation) संगणकीकरण करण्यात आलेल्या अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्येच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सुधारित इष्टांक देताना जिल्हा, शहर अथवा गाव हे घटक विचारात न घेता राज्य हा घटक विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ नुसार पात्र असलेल्या शिधापत्रिकेवरील ज्येष्ठ महिलेच्या नावावर कुटुंबप्रमुख असा शिक्का मारण्याची खबरदारी यंत्रणेला घ्यावी लागणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत जिल्हानिहाय इष्टांक वाढीबाबतचा शासन निर्णय दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

You cannot copy content of this page