संपादकीय… कोकणाच्या शाश्वत विकासाचा प्रसाद!
आपण अनेकजण कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात राहिलो. लहानाचे मोठे झालो. त्या गावाशी आजही आमची नाळ जोडलेली आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त गाव सोडावा लागला तरी वर्षातून कमीत कमी पाच सहावेळा गावी जाणं होतंच. गावात जाऊन काय मिळतं? हा सगळ्यात मोठा प्रश्न अनेकांना पडतो. विकासाच्या योजना गावागावात पोहोचल्या नव्हत्या; तेव्हा काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठीही खूप मोठे कष्ट करावे लागत. गावात रस्ते नव्हते, वैद्यकीय सोयी नव्हत्या. वाहनं नव्हती. त्यामुळे कोकणातील तरुण वर्ग मुंबईकडे निघाला. सिंधुदुर्ग मनीऑर्डरवर अवलंबून राहणारा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. पण आता परिस्थिती बदलली. रस्ते झाले, खाजगी वाहने वाढली. आता तर लाईफ स्टाईलच बदलून गेली. खूप मोठे बदल झाले. हे सगळे बदल आम्ही अनुभवले व अनुभवत आहोत. मात्र गावात राहून नेमकं काय मिळतं? ह्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे? गावात राहिल्याशिवाय ते अनुभवता येणार नाही. हे अनुभवविश्व पुस्तकी ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाचं असतं.
कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या अनेक घोषणा झाल्या. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून अनेक वर्षांपूर्वी जाहीर झालाय. शंभर टक्के साक्षर होणारा देशातील पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख आहे. सिंधुदुर्गात परराज्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत. मायनिंगच्या माध्यमातून खोदकाम सुरू आहे. प्रदूषणकारी प्रकल्प येण्यास सज्ज झाले आहेत. दरडोई उत्पन्न अधिक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. हे सर्व सुरू असताना कोकणचा विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शाश्वत विकास म्हणजे काय? तो कसा करावा लागेल? त्याचे फायदे कोणते? हे सगळं कृतीतून दाखविणारा प्रसाद गावडे आज कोकणचा खरा हिरो ठरलाय! रानमाणूस ही उपाधी घेतल्याने तो रानटी झाला नाही की आदिवासी! इंजिनियर असूनही त्याने जो मार्ग निवडलाय तो निश्चितच त्याच्यासाठी खडतर आहे, मेहनतीचा आहे, आर्थिक संपन्नता न देणारा आहे, आजच्या तथाकथित ‘लाईफ स्टाईल’ला छेद देणारा आहे! पण….
हा ‘पण’ खूप मोठा आहे कोकणासाठी, कोकणातील सर्व गावांसाठी आणि तेथील ग्रामस्थांसाठी, शहरात असलेल्या चाकरमान्यांसाठी! कारण प्रसाद गावडे ह्या युवकाने कोकणाला शाश्वत सर्वांगिण विकासाचा मार्ग दाखविला आहे. नव्हे तो त्या मार्गावरून चालतोय आणि इतरांना त्या महान कार्याची प्रेरणा देतोय! त्याच्या कर्तृत्वाला सलाम करावाच लागेल!
खऱ्या आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक असणारी मांडणी अभ्यासातून निरीक्षणातून आणि अनुभवातून प्रसाद गावडे यांनी मांडली! विशेष म्हणजे ज्या मातीत तो जन्मला त्या मातीवर त्याचे प्रेम आहे, त्या निसर्गावर त्याचे प्रेम आहे! त्या प्रेमातूनच त्याने कोकणच्या खऱ्या विकासाची मांडणी यशस्वी केली! शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध आहार देणारी; निसर्गाला देवाचा मान देणारी, पर्यावरण पूरक जीवन जगण्याची पद्धत प्रसाद गावडे याने पुनर्जीवित केली! हे आम्ही कोकणात राहूनही विसरलो होतो. आमच्या पूर्वजांनी ते जपलं होतं, ते आम्ही आधुनिक लाईफ स्टाईलच्या दरभद्री कुसंस्काराने घालविलं; पण प्रसाद गावडे याने आपले संपूर्ण करिअर ध्येय सिद्धीस नेण्यासाठी लावले आणि त्याने जुनी वाट नव्याने निवडली!
प्रदूषणकारी प्रकल्प आणि मायनिंगच्या व्यापारातून कोकणचा विकास होईल; असे जे चित्र रंगविले जाते हे किती खोटे व तकलादू आहे; हे अतिशय चांगल्या प्रकारे प्रसाद गावडे सांगू शकतो! खऱ्या अर्थाने प्रसाद गावडे याने घेतलेली भूमिका आणि केलेले कार्य कोकणासाठी, पर्यावरणासाठी, कोकणातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे व उपकारक आहे; हे लक्षात घेतले पाहिजे!
शेणाने सारवणे, मातीशी मैत्री करणे, शेती करणे, शेतात राबणे, गुरे सांभाळणे, खेडेगावात राहणे, मातीच्या घरात राहणे, पत्रावळीत जेवणे, उकड्या तांदळाची पेज पिणे, जेवणात पिठले व सुकाट खाणे म्हणजे कमी दर्जाचे व स्टेटसला न शोभणारे वाटते आजच्या पिढीला! आज कोकणातील प्रत्येकाला आधुनिक लाईफ स्टाईलने जगायचे आहे; जी मानवाला कर्करोगासारख्या गंभीर आजाराला आमंत्रण देणारी, मनःस्वास्थ्य बिघडविणारी असते! या सर्वांना छेद देऊन प्रसाद गावडे याने जीवन जगण्याचा कृतीशील आराखडा समोर आणलाय; त्याचे कृतिशील विचारच कोकणाला वाचवू शकतील! जर त्याला कोकणातील कोकणावर खरेखुरे प्रेम करणाऱ्या पर्यावरण स्नेही जनतेची साथ मिळाली तर आमचो ह्यो कोकण खऱ्या अर्थाने पुन्हा ‘स्वर्ग’ बनेल!
श्री. प्रसाद गावडे याच्या कार्याची दखल आज समाज घेतोय! उद्या २९ मे २०२५ रोजी युआरएल फाउंडेशन ह्या स्वयंसेवी संस्थेतर्फे मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता कृतज्ञता दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने श्री. प्रसाद गावडे उर्फ कोकणी रानमाणूस याला सामाजिक गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी युआरएल फाउंडेशनचे आभार आणि प्रसाद गावडे याचे मनःपूर्वक अभिनंदन व त्याच्या पुढील वाटचालीस पाक्षिक ‘स्टार वृत्त’ परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा!
-मोहन सावंत
सहसंपादक- पा. स्टार वृत्त