कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; चौघांचा मृत्यू!
३८ जणांची सुटका, २५ जण वाहून गेल्याची भीती!
३५ वर्षे जुना धोकादायक पूल कोसळल्याने भीषण दुर्घटना
पुणे:- मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३८ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र अद्यापही २० ते २५ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
दुर्घटनाग्रस्त पूल सुमारे ३५ वर्षांपूर्वी बांधलेला असून त्याची अवस्था अत्यंत जर्जर होती. स्थानिकांच्या माहितीनुसार, या पुलावरून दोनचाकी वाहनांचीही वाहतूक नियमित सुरू होती. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी या परिसरात गर्दी केली होती. त्याचवेळी पुलावर शेकडो पर्यटक असल्याने पूल क्षणात कोसळून अनेक जण नदीत वाहून गेले.
बचावकार्य सुरू – क्रेन व जवानांचे प्रयत्न
एनडीआरएफच्या जवानांनी कोसळलेल्या पुलाचा भाग मधोमध कापून क्रेनच्या साहाय्याने उचलण्याचे काम सुरू केले आहे. पुलाखाली अडकलेला एक मुलगा सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून आणखी एक व्यक्ती अडकलेली आहे, तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सरकारची मदत व तपासाचे आदेश
राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तसेच जखमींवरचा उपचार खर्च सरकारकडून केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेमागील कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे. पुलाची स्थिती अत्यंत गंजलेली होती, त्यामुळेच हा अपघात घडल्याची कबुलीही त्यांनी दिली.
सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा – मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश
ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून यापासून धडा घेत राज्यातील सर्व नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडमळा हे पर्यटनस्थळ पावसाळ्यात फारच लोकप्रिय असते, मात्र जुना आणि धोकादायक पूल असूनही प्रशासनाने सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या, ही बाब निदर्शनास आली आहे.
पावसामुळे नदीला पूर; प्रशासनाची निष्काळजीपणा उजेडात
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला जोरदार पूर आला आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहात अधिक वेग आहे. अशा स्थितीत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य खबरदारी घेणे आवश्यक होते, मात्र ती घेण्यात न आल्याने ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे स्थानिक प्रशासन, पर्यटन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील जुन्या आणि धोकादायक पूलांवर वाहतुकीचा भार येऊ नये, यासाठी त्वरित कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.