ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटरची जोडणी नको! – संतोष नाईक
कणकवली:- वीज ग्राहकांचे घरातील वीज मीटर ग्राहकांच्या लेखी पूर्व परवानगी शिवाय बदलण्यात येऊ नयेत! असे निवेदन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी रत्नागिरी येथे अनिल डोळे, मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित व कोकण परिमंडळ रत्नागिरी यांना लेखी स्वरुपात संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
कोकण परिमंडळ रत्नागिरी विभागात (सिधुदूर्ग,रत्नागिरी) मोठ्या प्रमाणावर घरगुती वीज ग्राहकांचे मीटर बदलून स्मार्ट मीटरची जबरदस्तीने जोडणी केली जात आहे. हे अन्यायकारक आहे. तसेच वीज ग्राहकाची आपला वीज मीटर बदलण्यासाठी वीज ग्राहकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर वीज ग्राहकाचा मीटर बदलण्यात यावा; अशी मागणी संघटनेच्या वतीने मुख्य अभियंता अनिल डोळे कोकण परिमंडळ कार्यालय, रत्नागिरी यांना करण्यात आली व आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला तशा सक्त सूचना करण्यात याव्या; असे सांगण्यात आले.
त्यावेळी उपस्थित कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली तालुका अध्यक्ष तथा स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स कणकवलीचे संचालक मंगेश चव्हाण उपस्थित होते.











