संपादकीय- अतिरेकी धर्मांधतेवर-दहशतीवर विजय मिळवायलाच पाहिजे!

काल झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्हायलाच पाहिजे. ज्यांनी हल्ला केला त्यांना आणि त्यांच्या मुख्य खलनायकांना फासावर लटकवलं गेलंच पाहिजे. हा नुसता भारतीय नागरिकांवरील भ्याड हल्ला नाही तर देशाच्या सार्वभौमत्वावर, देशाच्या अस्मितेवर, देशाच्या कर्तबगारीवर हा हल्ला आहे. त्यामुळे त्याची पाळंमुळं उखडून टाकता आली पाहिजेत. असे अनेक हल्ले भारतामध्ये झालेत. जेव्हा जेव्हा असे अतिरेकी हल्ले होतात तेव्हा तेव्हा देशातील जनतेचा संताप उग्र होतो. हा संताप योग्यच आहे; कारण हा देश माझा आहे, ह्या देशावर माझे प्रेम आहे; त्यामुळे ह्या देशात जो कोणी बंदुकीच्या- बॉम्बच्या सहाय्याने अतिरेकी कारवाया करेल त्याच्याविरुद्ध सर्व स्तरावर अगदी नियोजन पद्धतीने लढलंच पाहिजे. मग ते अतिरेकी देशाचे नागरिक असो परकीय असोत! त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. त्यामध्ये पर्यटकांचे जीव गेले, अनेकजण जखमी झाले. त्यानंतर अतिरेकी पसार झाले. त्यामधून अनेक गंभीर मुद्दे सहजपणे लक्ष येतात ते मांडावेसे वाटतात.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. हा सगळा संवेदनशील भाग आहे. स्थानिक पोलीस व सैन्याचा कडक पहारा आणि सुरक्षा व्यवस्था तिथे असते. त्यामध्ये कसलीही तडजोड केली जात नाही. असे असताना अतिरेकी येतात, पर्यटकांचा धर्म जाणून घेत त्यांच्यावर गोळ्या झाडतात आणि पळून जातात. एवढं सगळं घडण्यापूर्वी आणि घडल्यानंतर आमच्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला त्याची कल्पना आली नाही. पर्यटकांवर गोळ्या झाडून अतिरिके पळून गेले. जर तिथे सुरक्षा यंत्रणा असती तर अतिरेक्यांना तिथे संपविता आले असते किंवा त्यांना जिवंत पकडून त्यांच्या म्होरक्यापर्यंत पोहोचता आले असते. हे घडले नाही. ह्याचा अर्थ आपल्या सुरक्षा यंत्रणा कालच्या घटनेत कमी पडल्या; हे मान्य करावेच लागेल. कालच्या घटनेत अपयश का आले? भविष्यात नेमक्या काय उपाययोजना करणार? हे केंद्र सरकारने स्पष्ट केले पाहिजे!

हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांनी धर्माची चौकशी केली व जे मुस्लिम नाहीत त्यांना मारले. ह्याबाबत प्रसारमाध्यमांनी थोडा संयम दाखविला पाहिजे होता. पण त्यांनी टीआरपीच्या हव्यासापोटी जी घाई दाखविली ती देशात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरावी अशी आहे. जेव्हा दोन धार्मिक गटांमध्ये दंगल किंवा दंगल सुदृश्य घटना घडते तेव्हा प्रसारमाध्यमांनी वृत्तांकन करताना दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन अप्रिय घटना घडल्या; असे सांगणे गरजेचे असते. पण प्रसारमाध्यमांनी देशातील धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अतिरेक्यांना जणू काही संधी दिली! अतिरेक्यांना देशात अस्थिरता निर्माण करायची असते म्हणून ते लोकांवर गोळीबार करतात. सुरक्षा जवानांवर हल्ले करतात. देशामध्ये धार्मिक वाद निर्माण होण्यासाठी काल अतिरेक्यांनी धर्म विचारून जनतेला ठार केले. जेणेकरून देशात धार्मिक तेढ निर्माण झाले पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करणारा त्यांच्या कृतीला प्रसारमाध्यमांनी व राजकीय नेत्यांनी बळी पडता कामा नये. देशाला धार्मिक वाद परवडणारा नाही; हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे!

भारताच्या अस्मितेवर घाला घालण्यासाठी पाकिस्तानने नेहमीच अतिरेक्यांना सहकार्य केले. पुलवामा हल्ल्यानंतर अतिरेक्यांना दिलेले प्रतिउत्तर जबरदस्त होते; पण सैनिकांना प्रवास करण्यासाठी विमान न देता त्यांना रस्त्यावरून नेण्यात आलं. अशा गोष्टी काळाच्या ओघात स्पष्ट झाल्यानंतर सरकारच्या कामकाजाबाबत प्रश्न निर्माण झाले. ते दुर्दैवी होतं. म्हणून लोकभावना आणि प्रसारमाध्यमांची व नेत्यांची भडकाऊ भाषा ह्याला बळी पडून निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.

धार्मिक राष्ट्राचे स्वप्न बाळगणारे अतिरेकी आणि त्यासाठी भडकावू विधानं करणारे देशांमधील धार्मिक तेढ निर्माण होण्यासाठी योजना आखत असतात. हे खरेखुरे देशाच्या संविधानाचे मारेकरी आहेत. भारत हा खऱ्या अर्थाने लोकशाही देश आहे. देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या त्याच्या धर्मानुसार, पंथानुसार वागण्याचे स्वातंत्र्य आहे. ह्याचा अर्थ देशाच्या सार्वभौमत्वाला कोणी धर्माच्या माध्यमातून आव्हान देत असेल तर ते मोडीत काढायलाच पाहिजे. हा सुद्धा अतिरेकी हल्ला असतो व तो सुद्धा संपवायलाच पाहिजे. अतिरेक्यांनी काल आमच्या लोकांना मारले हे संतापजनक आहेच; पण त्यांनी जी धर्मांधता दाखवली ती संपण्यासाठी आम्हा भारतीयांना संयम राखून देशात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही; ह्याची काळजी घेतलीच पाहिजे! तरच अतिरेक्यांच्या धर्मांधतेवर आपण विजय मिळवू!