राज्यात १२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद
आतापर्यंत ३७ हजार ३९० रुग्णांना घरी सोडले
मुंबई:- राज्यात आज २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.
राज्यात ४७ शासकीय आणि ३८ खाजगी अशा एकूण ८५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ३७ हजार १२४ नमुन्यांपैकी ८२ हजार ९६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४६ हजार ५६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७४१ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ०९८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात १२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे.