कोरोना प्रतिबंधक लसीकरण करताना आपण काळजी घेतो का?

कोरोना प्रतिबंधक लसीकरण करताना आपण काळजी घेतो का?
अन्यथा कोरोना प्रतिबंधक लसीचा काहीच फायदा होणार नाही.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण अत्यावश्यक आहे, परंतु सदर लस कुठल्याही व्यक्तीला देईपर्यंत जर चुकीच्या पद्धतीने हाताळली तर ती लस कोरोनाला प्रतिबंध करणार नाही. आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाले असून अनेक ठिकाणी सदर लस अयोग्य पद्धतीने हाताळली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने सावध राहिले पाहिजे. कोरोना प्रतिबंधक लसीची हाताळणी करताना नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे; हे पाहणे महत्वाचे ठरते.

यासंदर्भात आमदार बबनराव लोणीकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे डॉ. नागेंद्र किशनप्रसाद येम्बरवार, नवी मुंबई यांच्या नावे समाजमाध्यमांवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. आमदार बबनराव लोणीकर आणि डॉ. नागेंद्र किशनप्रसाद येम्बरवार यांच्या पत्रातील महत्वाचे मुद्दे…

निरीक्षण:-
-एका ठिकाणी लस व्हायल आईस क्यूबमध्ये होती पण आईस क्यूबमध्ये बर्फाऐवजी पाणी होते.
-दुसऱ्या ठिकाणी चार वाजता पश्चिमेच्या खिडकीतून ऊन टेबलावरील वॅक्सीन व्हायल वर पडत होते, लसीची व्हायल गरम झालेली होती, तरीदेखील त्यातूनच टोचण्याचा कार्यक्रम चालूच होता.
-दोन्हीही ठिकाणी लसीची बाटली (व्हायल) पकडायला थंड केलेला फोरसेप नव्हता. अगदी मुठीत व्हायल घट्ट पकडून सिरिंजने व्हॅक्शीन काढून टोचलं जात होतं.

सध्याच्या कोरोना लसीकरणात कोल्डचेन मेनटेन न झाल्यास ही लसीकरण मोहीम वरदान ठरण्याऐवजी शाप ठरेल.

कारणे:-
१) कोव्हीशिल्ड हे वॅक्सीन प्राण रक्षक आहे.तसेच ते तितकेच नाजूकही आहे.

२) त्याचे तापमान (टेंप्रेचर) २ ते ८ डीग्री सेंटीग्रेड राखलं गेलं (मेन्टेन झालं) तरच ते उपयोगी आहे.

३) तापमान राखलं गेलं नसेल तर लसीचे इंजेक्शन म्हणजे शुध्द पाण्याचे (डिस्टील्ड वाॅटरचे) इंजेक्शन घेतल्यासारखे होईल व त्याचा काहीही उपयोग होणार नाही.आणि अशी लस घेतली गेली तर कोविड पुन्हा होऊ शकतो.

४) सदरील लस कारखान्यात तयार झाल्यापासून तर थेट लाभार्थ्यांना टोचण्यापर्यंतचा हा प्रवास खूप मोठा आहे व अनेक स्तरातून (स्टेजमधून) जाणारा आहे. अनेक व्यक्ती, वाहने, साठवणूक शीतयंत्र ( रेफ्रीजेटर्स), टोचणाऱ्या व्यक्ती यांच्याद्वारे हाताळले जाणारे आहे.

५) या सर्व प्रवासात या लसीचे तापमान २ ते ८ डिग्री सेंटिग्रेट राखणं म्हणजेच त्याची शीत साखळी अबाधित (कोल्डचेन) मेन्टेन करणे होय. हे अत्यंत जटील आणि जबाबदारीचे काम आहे.

६) मिडियावर चर्चा आहे की काही लोकांना दोन्ही डोस घेऊनही पुन्हा करोना होत आहे. तर त्या लोकांना ही “कोल्डचेन (शीतसाखळी ) मेन्टेन झाली नसलेली” लस टोचली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

७) कारण ही लस साठवण्यासाठी साधा फ्रीज चालत नाही. याचे कारण यात टेम्प्रेचर (तपमान) सतत कमी जास्त होत असते.समजा हा साधा फ्रीज फार वेळ बंद राहीला म्हणजे उदा. जेव्हा रात्रभर बंद असतो तेव्हा तपमान हे 2 डिग्रीच्या खाली जाते बर्फ तयार होते आणि जर फ्रीज उघडला तर आतली थंड हवा जड असल्यामुळे झटकन खाली पायाकडे जाते. याचा पायांवर एकदम थंड झोत येण्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. पण त्याचवेळेला लगेच वरची गरम हवा फ्रीजमध्ये घुसते. ही गरम हवा थंड होताना तापमान एक डिग्री सेल्सियसने कमी होताना लॅटन्ट हीट 540 कॅलरीज एवढी रीलीज होते. त्यामुळे सुरुवातीला फ्रीजची आतली हवा गरम होते व ताबडतोब तापमान ८ डिग्रीच्या वर वाढते म्हणजे लस ठेवण्यासाठी ह्या फ्रीजचा उपयोग होत नाही. तसेच ही लस नजर चुकीने जरी गोठली गेली तरीही देखील तिची क्षमता नष्ट होते.

म्हणून या लसीसाठी स्पेशल असा ILR(आईस लाईन्ड रेफ्रीजेटरच) पाहिजे असतो.त्याची रचना म्हणजे त्याच्या कडेला एकमेकांना चिकटून उभ्या बर्फ भरलेल्या नळ्या बसवलेल्या असतात. शिवाय तो आडवा असतो त्यामुळे उघडला तेव्हा त्यातील जड थंड हवा त्यातच राहते व त्याचे तपमान स्थीर २ ते ८ डिग्रीच असते. हे आपणा सर्वांना माहीत असेलच.

“लसीचे बर्फ करायचे नाही तर ती बर्फाशेजारी ठेवायची आहे. “

८) असे ILR सरकारी दवाखान्यात असतीलच पण लस टोचणाऱ्या खाजगी हाॅस्पिटलमध्ये असे फ्रीज आहेत का? याची खातरजमा करून घेणे जरूरीचे आहे. नसतील तर खाजगी अथवा सरकारी लस केंद्रे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देऊन ताबडतोब बंद करावीत.

९) या ILR पासून तर आपल्याला टोचण्यापर्यंतचा लसीचा प्रवास व हाताळणी ही आरोग्य कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाची जबाबदारीची असते.

१०) ILR मधून लस काढून ती लस सेंटरवर पोहचवण्यासाठी ते “वॅक्सीन कॅरियर” या बाॅक्समध्ये टाकून न्यावी लागते. तर ह्या “वॅक्सीन कॅरियर” मध्ये वॅक्सीन बाटल्या ज्याला मेडीकल भाषेत “व्हायल” म्हणतात, त्या ठेवताना सरसकट एकदम ओंजळ भरून कांदे बटाटे घेतले आणि वॅक्सीन कॅरियर मध्ये टाकले असे करता येणार नाही. कारण त्याचा शरीराशी संपर्क येईल व त्याचे तापमान आपल्या शरीरा इतके म्हणजेच ३७.५ डिग्रीला पोचेल. त्यामुळे लस निरूपयोगी होईल.

११) असे होऊ नये म्हणून ही प्रत्येक व्हायल एक एक करून अगोदर थंड करून ठेवलेल्या चिमट्याने अलगद उचलून वॅक्सीन कॅरियरमध्ये ठेवायला पाहिजे.

१२) हा व्हॅक्शीन कॅरियर ज्यात एक तास अगोदरच आइस पॅक ठेवून थंड केलेला असावा. नाहीतर घेतला वॅक्सीन कॅरियर आणि भरले त्यात व्हॅक्शीन, तर या रूम टेम्रेचरला असलेल्या म्हणजे गरम , २८-३० डिग्रीला असलेल्या हवेने या वॅक्सीन कॅरियरमध्ये वॅक्सीन व्हायलचे तापमान वाढून वॅक्सीन निकामी होऊ शकते. यात लस ठेवल्यानंतर वॅक्सीन कॅरियर टाईट बंद असावा.

१३) आरोग्य कर्मचाऱ्यांनी वॅक्सीन सेंटरवर हे वॅक्सीन कॅरियर सावलीत घेऊन जायचे व जमल्यास वातानुकूलित गाडीतूनच न्यावेत. कुठल्याही परिस्थितीत गाडीतून नेताना त्यावर गाडीच्या खिडकीतून गरम हवा किंवा ऊन पडणार नाही याची काळजी घ्यावी.

१४) वॅक्सीन टोचण्यासाठी एक एक व्हायल बाहेर काढताना पूर्वीच थंड (प्री कूल्ड) केलेल्या चिमट्यानेच पकडून बाहेर काढावे. मुठीत पकडून नाही.

१५) बाहेर काढलेली लसीची बाटली आइस पॅकमध्येच ठेवावे.

त्या ऐवजी बऱ्याच ठिकाणी बाहेरच टेबलावर पडलेले वॅक्सीन व्हायल (बाटली) दिसते किंवा आइस पॅकमध्ये ठेवलेले तर दिसते. पण त्या आईस पॅकमध्ये आइसचे पाणी झाल्यास ती लस निरुपयोगी समजली जाते. अशावेळी त्या आइस पॅकचे पाणी होण्यापूर्वीच कालांतराने नवा आईस पॅक घेतला गेला असावा. सध्या उन्हाळा सुरु झाला आहे, त्यामुळे लस दिल्या जाणाऱ्या खोलीचे तापमान जास्त असल्यास किंवा खिडकीतून टेबलावर ऊन येत असल्यास त्या टेबलावर हे वॅक्सीन व्हायल असेच ठेवलेले दिसल्यास अशा लसीचा काहीही उपयोग होणार नाही.

१६) शेवटची व महत्त्वाची स्टेप; जिथे हमखास चूक होतेच ती म्हणजे लसीची बाटली (vial) सर्व बोटांनी किंवा मुठीत पकडायची नाही. कारण तसं जर झालं तर वॅक्सीनचं तापमान शरीराइतके होऊन वॅक्सीन निकामी होईल.त्यासाठी त्या लसीची बाटली अंगठा व अंगठ्याजवळचे बोट त्यानेच व ते ही बाटलीच्या (vial) तोंडाला जिथं आत रबरी बूच आहे (स्टाॅप रबर) आहे, तिथे पकडून त्यातून हवं तेवढा डोस काढून झाल्यावर ताबडतोब आइसपॅक मध्येच ती बाटली व्हायल ठेवावी. म्हणजे तापमान मेन्टेन राहील.

अशी ही प्रक्रिया आहे. यासंबंधी सखोल ट्रेनिंग सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलेले असते. मात्र कामाच्या व्यापामुळे प्रत्यक्ष लस देणाऱ्या व्यक्तीकडून त्याकडे दुर्लक्ष होते.आणि तसे झाले तर कोट्यवधी रूपये किमतीची ही लस वाया जाईल आणि हा प्रचंड खर्च, श्रम व वेळ वाया जाऊन लाभार्थ्यांना याचा मुळीच उपयोग होणार नाही.

आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर इंजेक्शन/ सुई नवीन आहे का?याची खबरदारी घेतो तसेच सलून दुकानात गेल्यानंतर ब्लेड नवीन आहे का? याची खबरदारी घेतो. त्याप्रमाणे ही लस घेण्यापूर्वी शितसाखळी अबाधित असल्याची खातरजमा करूनच लस टोचून घ्यावी.

लसीचा पहिला डोस आणि २८ दिवसांनी दुसरा डोस टोचून घेतल्यानंतर लस घेतल्याची तारीख आणि वेळ असल्याचे दोन्ही वेळेस प्रमाणपत्र न विसरता घ्यावे. भविष्यात या प्रमाणपत्राची देशात व परदेशात सरकारी कार्यालयात मागणी केली जाऊ शकते.

ह्या लसीची क्षमता ७०-८० टक्केच आहे म्हणजे १०० टक्के सरंक्षण ती देऊ शकत नाही. मात्र काटेकोर कोल्डचेन मेन्टेन केलेली लस टोचली गेली तर ७०% सरंक्षण मिळेल त्यामुळे जीव तर नक्की वाचेल यात मुळीच शंका नाही. पण कोल्डचेन मेन्टेन न केलेली लस टोचली गेली तर कुणालाही अजिबात कोरोनापासून सरंक्षण मिळणार तर नाहीच किंबहुना जनता लस घेतल्याच्या फसव्या भ्रमात राहील. ते मास्क वापरणार नाहीत, काळजी घेणे बंद करतील आणि मग कोरोना केसेस अशाच भरमसाठ वेगाने वाढत राहतील.

लसीकरणातून सरंक्षण मिळण्याऐवजी आपल्याला तो शाप ठरणार नाही.याची सद्सद्विवेक बुद्धीने नोंद घ्यावी.

You cannot copy content of this page