पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला, २६ जणांचा मृत्यू

श्रीनगर : काल दुपारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचाही समावेश आहे. पुण्यापाठोपाठ डोंबिवलीमधील ३ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील एका प्रमुख पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये दोन परदेशी पर्यटकांसह २६ जणांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यात इतर अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांना जम्मू – काश्मीरमध्ये श्रद्धांजली वाहिली. यानंतर शाह यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचं सांत्वन केलं.

पंतप्रधानांनी सौदीचा दौरा अर्ध्यावरच रद्द केला : या घटनेचे गांभीर्य पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावरच रद्द केला. पंतप्रधान मोदी हे आज कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक घेणार आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेण्याआधी सौदीच्या प्रिन्सशी सविस्तर चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.