प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य करताना बचाव दलाच्या तीन जणांना वीर मरण

मुंबई:- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगाव बु. येथे प्रवरा नदीपात्रामध्ये दोन मुले बुडाली असल्यामुळे महसूल व वनविभाग मंत्रालय यांचे आदेशान्वये घटना स्थळावर शोध व बचाव कार्य करण्यासाठी राज्य राखीव पोलीस बलाचे अंतर्गत असलेले राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथील एक बचाव तुकडी दि.२२.०५.२०२४ रोजी १९.४४ वाजता रवाना करण्यात आली होती.

ही तुकडी घटनास्थळी पोहचून दिनांक २३.०५.२०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजता अतिशय शौर्याने शोध व बचाव कार्य करतेवेळी नदी पात्रामधील पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पाण्याचा तीव्रवेग व पाणी उसळी खात असल्यामुळे बोट पाण्याच्या भोवऱ्यात उलटून दुर्देवी घटना घडली. त्यात १ पोलीस अधिकारी व ४ पोलीस अंमलदार हे पाण्याच्या प्रवाहात अडकले, त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, सपोशि/०३ वैभव सुनिल वाघ आणि पोशि/ २८६ राहुल गोपिचंद पावरा यांना वीर मरण आले आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त बोटीमधील २ पोलीस अंमलदार यांना वाचवण्यात यश आले, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस दल यांनी दिली आहे.

या घटनेची माहिती प्राप्त होताच महसूल मंत्री व अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आ. किरण लहामटे, पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, व स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली व वीरमरण आलेल्या अधिकारी व अंमलदार यांचे पार्थिवावर शासकीय इतमामात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

You cannot copy content of this page