देशासाठी, मातृभूमीसाठी, धर्मासाठी, स्वतःसाठी, आप्तांसाठी `श्रीराम राम रणकर्कश राम राम’ हा मंत्र पठण करा!
गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी पितृवचन होण्यापूर्वी परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या आप्तांसाठी `श्रीराम राम रणकर्कश राम राम’ हा मंत्र श्रद्धावानांना पठण करावयास लावला आणि दररोज किमान पाच वेळा म्हणण्यास सांगितले. ज्यातून अतिशय समर्थ रणगंभीर स्पंदनं तयार होतील ती आमच्यासाठी उपयुक्त असतील! श्रीरामरक्षा स्तोत्र आणि मंत्रातील `श्रीराम राम रणकर्कश राम राम’ ह्या चरणावर परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी ८ फेब्रुवारी २००७ रोजी अत्यंत महत्वाचे प्रवचन केले होते. त्याचा संदर्भ घेत खालील लेख लिहिला आहे. |
रणकर्कश होण्यापूर्वी श्रीरामाच्या रघुनंदन-भरताग्रज रूपाला शरण गेलं पाहिजे!
श्रीराम राम रणकर्कश राम राम
।। हरि ॐ।।
श्रीरामरक्षा स्तोत्र आणि मंत्रातील प्रत्येक श्लोक, प्रत्येक चरण अतिशय पवित्र आहेच! त्याचबरोबर परमात्मा `श्रीराम’ कसा आहे? तो कार्य कसे करतो? ह्याचे सखोल आणि समर्पक वर्णन बुधकौशिक ऋषींनी केले आहे.
श्रीराम राम रघुनन्दन राम राम।
श्रीराम राम भरताग्रज राम राम।
श्रीराम राम रणकर्कश राम राम।
श्रीराम राम शरणं भव राम राम।।
रघुनंदन असणारा राम, भरताच्या मोठा भाऊ असणारा राम रणकर्कश आहे! रणकर्कश रामा मी तुला शरण जातो. तू माझं रक्षण कर!
राम नुसता रणवीर नाही तर रणकर्कश आहे. कुठल्याही युद्धाच्या रणांगणात तो वीर आहेच त्याचबरोबर रणकर्कश आहे. दुष्टांच्या आणि अपवित्रतेच्या विरोधात एका क्षणात तो एवढा निष्ठूर होऊ शकतो की, कोणीही असो, पर्वतापेक्षाही मोठा पर्वत, त्याच्यापेक्षा मोठा मनुष्य असो वा राक्षस असो, किती मोठी अमाप ताकद असो; तो एकटा अत्यंत निष्ठूरपणे त्याचा बिमोड करतो. तर मग लहान-सहान किटकांची काय कथा?
मात्र ह्या रामाचा बाण, ह्या रामाचं खड्ग, ह्या रामाचं कुठलंही आयुध; कधीही पवित्रेवर सोडलं जातं नाही! अगदी लाख मनुष्यांमध्ये एक मनुष्य पवित्र असेल, बाकीचे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अपवित्र असतील तर रामाचा बाण त्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव लोकांना बरोबर गाठेल आणि एकाला बरोबर वाचवेल! हे लक्षात ठेवा! असा हा रणकर्कश राम! त्याची ही रणकर्कशता आम्हाला स्वागतार्ह असली पाहिजे.
श्रीरामाला रणकर्कश मानण्यामध्येच आमचं हित आहे. कारण आम्ही जोपर्यंत जाणत नाही की, हा राम रणकर्कश आहे तोपर्यंत आम्ही आमचं जीवन सुधारू शकत नाही आणि एक दिवस ही रणकर्कशता आमच्या वाट्याला येते.
आम्ही बऱ्याच वेळा चालत राहतो चुकीच्या मार्गावरून! आम्हाला वाटतं की, ह्याच्यामध्ये काय आहे? काहीच नाही. नतंर जेव्हा प्रसंग येऊन आमच्या समोर उभा राहतो तेव्हा आम्हाला कळतं बापरे भलतंच होतं. दुसऱ्याला दोष देताना, दुसऱ्यावर आरोप करताना, दुसऱ्याला त्रास देताना, दुसऱ्यायाला पीडा देताना, स्वत:चा मोठेपणा मिरविताना आम्हाला काहीच वाटत नसतं.
लोकांचा वेळ चोरताना आम्हाला काही वाटत नसतं, लोकांचं कर्म चोरताना आम्हाला काही वाटत नसतं. देवाचे पैसे चोरतानाही अनेकांना काही वाटत नसतं. त्यांना वाटतं कोणाला काय कळतंय? परंतु ज्याला कळायचं त्याला कळत असतं आणि ज्याला कळत असतं तो राम कसा आहे?
रघुनन्दन राम राम
तो आम्हाला सगळं काही देणारा आहे. आम्हाला लघुत्वाकडून रघुत्वाचा प्रवास करण्याचा मार्ग देणारा हा रघुनाथ आहे. हा भरताग्रज आहे. भरताचा मोठा भाऊ आहे आणि जो जो भक्ती मध्ये रस झालेला आहे, त्याचा लहान भावाप्रमाणे सांभाळ करणारा हा राम!
परंतु जो लघुत्वाचा त्याग करण्यास सिध्द नाही, रामनाम घेण्यास सिध्द नाही, जो त्याचं वागणं बदलण्यास सिध्द नाही, `जो भरताप्रमाणे रामाच्या आज्ञेत राहून सगळं वैभव मिळालं तरी राम नसेल तरी मी त्या वैभवाचा स्वीकार करणार नाही’ असं जो मनात आणत नाही, जो रामाला सर्वाच्च मानत नाही, जो भगवंताला आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान देत नाही त्याच्या पुढे मात्र राम रणकर्कश म्हणून येऊन उभा राहतो. म्हणून शरण जावंच लागतं.
पण ते कोणाला जायचं? रघुनंदन रामाला जायचं, भरताग्रज रामाला जायचं की तो रणकर्कश बनल्यानंतर मग शरण जायचं? ह्याचा विचार करायला हवा आणि एकदा का तो रणकर्कश बनला की मग जे शरण येतात त्यांच्याकडे तो ढुंकूनही बघत नाही. तो त्यांचा बिमोडच करतो. तर त्याचं रणकर्कश स्वरूप उघड होण्याच्या अगोदर त्याचं प्रेमळ स्वरूप
भरताग्रज राम राम
रघुनंदन राम राम
त्याचं प्रेमळ स्वरूप, कृपाळू स्वरूप. त्याला जे शरण जातात, ते रूप मनात आणून-ते गुण मनात आणून जे शरण जातात त्याचं संरक्षण करतो. तो रणकर्कश आहे हे जाणून तो रणकर्कश बनायच्या अगोदरच त्याला जे शरण जातात त्यांना प्रॉब्लेम येत नाही. मात्र त्याचं रणकर्कश रूप प्रकट झालं की मग घाबरून जाऊन, भिऊन जाऊन जे त्याच्या आश्रयाला येऊ बघतात किंवा शरण येण्याचं ढोंग करतात त्या वेळेला त्यांना मात्र तो जराही दया-माया न दाखविता अख्ख्या द्वारकेलाही बुडवून टाकतो; एका क्षणामध्ये! जी द्वारका त्यानेच निर्माण केलेली होती. (क्रमशः)