‘महात्मा गांधी संकलित वाङ्मय -भाग २’चे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई:- १९३१ ते १९४८ या कालखंडातील महात्मा गांधी यांनी केलेला पत्रव्यवहार, नवजीवन, यंग इंडिया, तरूण भारत, बॉम्बे क्रोनिकल, हिंदुस्तान टाईम्स, इ. नियतकालिकांमधील लेखांचा समावेश असलेल्या महात्मा गांधी संकलित वाङ्मय भाग २ (खंड ५१-९८) चे प्रकाशन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या महात्मा गांधी संकलित वाङ्मय- भाग २ मध्ये भारतीय इतिहासाच्या आधुनिक युगातील वंदनीय व्यक्तिमत्त्व महात्मा गांधी यांची स्फूर्तिदायक कहाणी, त्यांचा व्यक्तिविकास, जीवनात त्यांनी केलेल्या कार्यांचा वृत्तांत त्यांच्या स्वत:च्या लेखनाद्वारे व भाषणांद्वारे सांगितला गेला आहे. हे त्यांचे लेख व त्यांची भाषणे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातून प्रसिद्ध झाली आहेतच. याशिवाय सरकारी नोंदपत्रे, फाइली, सरकारी अहवाल आणि इंग्रजी, गुजराती व हिंदी नियतकालिके यातही आहेत. तसेच त्यांची पत्रे जगभर पसरलेल्या अनेक बड्या व सामान्य, श्रीमंत व गरीब, प्रत्येक वंशाच्या व धर्माच्या लोकांजवळ होती. अशी अनेक भाषणे, पत्रे व लेख एकत्र करून, गांधीजींनी एका विश्वस्तनिधीतर्फे स्थापलेल्या अहमदाबादच्या नवजीवन पब्लिशिंग हाऊस या संस्थेने ते वाङ्मय गुजराती भाषेत प्रसिद्ध केले होते. नंतर भारत सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाने हे वाङ्मय इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये प्रसिद्ध केले. तसेच महात्मा गांधींची त्यांच्या लिखाणातून दिसून येणारी विचारप्रणाली जनतेसमोर यावी या हेतूने या वाङ्मयाचे भाषांतर प्रादेशिक भाषांमधून व्हावे, अशी सूचना भारत सरकारने राज्य सरकारांच्या विचारार्थ पाठविली. ही सूचना तेव्हाच्या मुंबई सरकारला पसंत पडली. यावर मुंबई सरकारने या वाङ्मयाचे मराठी रूपांतर करण्याचे काम हाती घेतले आणि १८ एप्रिल १९५९ रोजी या कामासाठी एका समितीची स्थापना केली.
सन १९५९ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली महात्मा गांधी संकलित वाङ्मय मराठी भाषांतर समितीची स्थापना करण्यात येऊन त्या समितीचे सचिव म्हणून दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव यांची नेमणूक करण्यात आली. या योजनेंतर्गत एकूण ६१ खंड मराठी भाषेमध्ये ग्रंथ रूपात प्रकाशित करण्यात आले. उर्वरित ३७ खंडांचे मराठीत भाषांतर करून आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात महात्मा गांधी संकलित वाङ्मयाचे हे ९८ खंड ई- बुक स्वरूपात प्रकाशित करून पेन ड्राईव्ह मध्ये वाचकांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
समग्र महात्मा गांधी संकलित वाङ्मय (खंड १-९८) हे सर्व खंड दर्शनिका विभागातर्फे मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या महात्मा गांधी संकलित वाङ्मय भाग १ चे १ ते ५० खंड ई स्वरूपात २ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित करण्यात आले होते.











